खड्ड्यांचे विघ्न नकोच
By Admin | Updated: August 26, 2014 01:07 IST2014-08-26T01:07:21+5:302014-08-26T01:07:21+5:30
‘श्री’चे आगमन होणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील खड्डे २९ आॅगस्टपर्यंत बुजवा व त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर रस्त्यांवरील खड्डे बुजवा, असे आदेश पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी नागपूर महापालिका,

खड्ड्यांचे विघ्न नकोच
‘श्री’च्या आगमनापूर्वी खड्डे बुजवा : पालकमंत्र्यांचे आदेश
नागपूर : ‘श्री’चे आगमन होणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील खड्डे २९ आॅगस्टपर्यंत बुजवा व त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर रस्त्यांवरील खड्डे बुजवा, असे आदेश पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी नागपूर महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले.
नागपूरमधील रस्त्यावर पडलेले खड्डे व त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास याबाबत सोमवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत पालकमंत्री नितीन राऊत यांनी महापालिका आयुक्तांना सोबत घेऊन शहरातील विविध भागांना भेटी देऊन खड्ड्यांची पाहणी केली. त्यानंतर दुपारी रविभवनमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी वरील निर्देश दिले. या बैठकीनतंर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी खड्डे बुजविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष कार्यक्रमाची माहिती दिली.
शहरात केलेल्या दौऱ्याच्या वेळी अनेक ठिकाणी खड्डे आढळून आले. ठिकठिकाणी मेनहोल्स उघडे पडले होते. खड्ड्यांमुळे मणक्याचे आजार होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे तातडीचा प्रश्न म्हणून यासंदर्भात बैठक घेण्यात आली, असे त्यांनी स्पष्ट केले.२९ आॅगस्टपासून गणेशोत्सव सुरू होणार असून ‘श्री’च्या आगमनाचा, विसर्जनाच्या मार्गावरील खड्डे प्राथमिकतेने बुजविणे गरजेचे आहे. त्यासाठी तीन टप्प्याचा कार्यक्रम देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजे २८ आॅगस्टपर्यंत ‘श्री’चे आगमन ज्या रस्त्यांनी होते ते मार्ग, दुसऱ्या टप्प्यात म्हणजे ७ सप्टेंबरपर्यंत विसर्जनाच्या मार्गावरील खड्डे आणि तिसऱ्या टप्प्यापर्यंत म्हणजे १० सप्टेंबरपर्यंत उर्वरित शहरातील मार्गावरील खड्डे बुजवण्यास सांगण्यात आले, असे राऊत म्हणाले.
शहरात नागपूर सुधार प्रन्यास, महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा मार्ग आणि इतर असे एकूण ३९६० कि.मी.चे रस्ते आहेत. महापालिकेच्या रस्त्यावर ५००० खड्डे आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नागपूर-हैदराबाद महामार्गावर ५५ तर नागपूर-जबलपूर मार्गावर २९ खड्डे आहेत. जुना वळणमार्ग पूर्णपणे उखडला असून, सुधार प्रन्यासच्या रस्त्यावर किती खड्डे आहेत, याची माहिती त्यांच्याकडे नाही.
खड्डे बुजवताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे तसेच याबाबतची माहिती रोज देण्याचे आदेश यंत्रणांना दिले आहे, असे राऊत यांनी सांगितले. या कामासाठी यंत्रणांकडे निधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरात विविध यंत्रणांचे रस्ते असले तरी नागरी सुविधा देण्याची जबाबदारी ही महापालिकेची असल्याने त्यांनी याबाबत गंभीर असणे गरजेचे आहे. कधी काळी नागपूर येथील रस्त्यांमुळे ओळखले जात होते. ‘टॉप टेन’ सिटीमध्ये शहराचा समावेश होता. मात्र महापालिकेने त्याची वाट लावली, असा आरोपही यावेळी राऊत यांनी केला. वर्ल्डक्लास सिटीचे सादरीकरण सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात करावे, अशा सूचनाही महापालिकेला देण्यात आल्या. पत्रकार परिषदेला काँग्रेस नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व काँग्रेस नेते जयप्रकाश गुप्ता उपस्थित होते. (प्रतिनिधी)