वेल्डिंग फ्रॅक्चरमुळे अपघात झाल्याचे स्पष्ट?
By Admin | Updated: May 23, 2014 04:23 IST2014-05-23T04:23:13+5:302014-05-23T04:23:13+5:30
नागोठणेजवळ दिवा-सावंतवाडी पॅसेंजरचा अपघात प्रथम अतिवेगामुळे झाल्याचे सांगण्यात येत होते.

वेल्डिंग फ्रॅक्चरमुळे अपघात झाल्याचे स्पष्ट?
मुंबई : नागोठणेजवळ दिवा-सावंतवाडी पॅसेंजरचा अपघात प्रथम अतिवेगामुळे झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र लोको पायलटने रेल्वे सुरक्षा आयुक्तांना दिलेल्या जबाबात हा अपघात वेल्डिंग फ्रॅक्चरमुळेच झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र सुरक्षा आयुक्तांच्या चौकशी अहवालानंतरच ते स्पष्ट होणार आहे. ४ मे रोेजी नागोठणे ते रोह्यादरम्यान भिसे खिंडीजवळ या ट्रेनचे पाच डबे रुळावरून घसरले. या अपघातात २२ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. ज्या ठिकाणी अपघात घडला त्या भागात ५ अंशाचा वक्र असून, तेथे ५५ची वेगमर्यादा आखून देण्यात आली आहे. ज्या पद्धतीने डबे पलटी झाले ते पाहता अतिवेगामुळेच अपघात झाल्याची चर्चा होत होती. त्यादृष्टीने रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडूनही तपास सुरू होता. मात्र अपघाताची चौकशी करताना लोको पायलटचा जबाब रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून नोंदवण्यात आला असून, यात अतिवेगामुळे अपघात झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या भागात अपघात घडला त्या ठिकाणी ट्रेन आली असता एक मोठा आवाज झाला आणि ट्रेनचे डबे पलटी झाल्याचे सांगितले; तसेच वेगही नियंत्रित असल्याचे जबाबात म्हटले. याबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी म्हणाले, आमच्याकडून अपघातग्रस्त गाडीच्या वेगाचीही तपासणी करण्यात आली असता नियमाप्रमाणे त्या भागात गाडीचा वेग नियंत्रित असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अतिवेगामुळे हा अपघात झालेला नसल्याचे स्पष्ट होते. आतापर्यंत रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी ३०पेक्षा जास्त साक्षीदारांचा जबाब घेतला असून, यामध्ये रेल्वेचे कर्मचारी, प्रवासी आणि पोलिसांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)