...मग महाराजांचे नाव का घेता - शरद पवार

By Admin | Updated: October 13, 2014 05:34 IST2014-10-13T05:34:12+5:302014-10-13T05:34:12+5:30

सत्तेच्या हव्यासापोटी सध्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला जात आहे

... then take the name of Maharaj - Sharad Pawar | ...मग महाराजांचे नाव का घेता - शरद पवार

...मग महाराजांचे नाव का घेता - शरद पवार

मुंबई : सत्तेच्या हव्यासापोटी सध्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला जात आहे. पण त्याच भाजपाशासित गुजरात राज्यात सरकारच्या अधिकृत शालेय पुस्तकातून सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे आजोबा असल्याचा खोटा इतिहास शिकवून शिवाजी महाराजांची बदनामी केली जात आहे. त्यामुळे चुकीचा इतिहास सांगणाऱ्या भाजपाला शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर केली.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने विधानसभा निवडणूक वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर शरद पवार यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटल्याच्या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाच्या चर्चेत आम्ही काँग्रेस पक्षाकडे निम्म्या जागांची मागणी केली होती. तरीदेखील आम्ही १२५ ते १३० जागा मान्य करण्याच्या विचारात होतो. मात्र काँग्रेस पूर्वीपासूनच स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्यामुळे काँग्रेसने पहिल्यांदा आपली १३० जागांच्या उमेदवारांची यादी आमच्याशी कोणतीही चर्चा न करता प्रसिद्ध केली. तेव्हाच काँग्रेसची स्वतंत्र लढण्याची भूमिका स्पष्ट झाली. त्यामुळे आम्हाला देखील स्वतंत्र लढण्याचा निर्णय घ्यावा लागला.
महाराष्ट्र एकसंध राहावा ही भूमिका, पण जनमतही महत्त्वाचे
पत्रकारांनी वेगळ््या विदर्भाबाबत शरद पवार यांना छेडले असता ते म्हणाले की, भाजपाने वेगळ््या विदर्भाचा मुद्दा जाहीरनाम्यातून आता काढून टाकला आहे. असे असले तरी त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यातून वेगळ्या विदर्भाबाबत काय भूमिका आहे, हे त्यांनी लपवून ठेवलेले नाही. महाराष्ट्र एकसंघ राहावा, ही राष्ट्रवादीची आधीपासूनची भूमिका आहे. त्यासाठी अनेकांनी खस्ता खाल्लेल्या आहेत. एखाद्या भागाला वेगळे व्हावसे वाटत असेल, चार राजकीय नेत्यांनी सांगितलं म्हणून ते आम्ही मान्य करणार नाही. ज्या वेळी गोवा वेगळा होण्याचा प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा लोकांचे मतदान घेण्याचे ठरवले गेले. त्या वेळी ४९.५ टक्के लोकांनी महाराष्ट्रात सामील होण्याची, तर ५०.५ टक्के लोकांनी वेगळ््या गोव्याची मागणी केली. केंद्र सरकार आणि महाराष्ट्राने बहुमताचा कौल स्वीकारला होता. विदर्भाबाबत जर निर्णय घ्यायचा असेल, तर खाजगी संस्थेच्या माध्यमातून एक-दोन शहरांचा केलेला सर्व्हे आम्हाला मान्य नाही. प्रश्न हाताळायचा असेल तर निवडणूक आयोगामार्फत संपूर्ण विदर्भातील जनमत चाचणी घ्या, असेही पवार यांनी सुचविले. (प्रतिनिधी)

Web Title: ... then take the name of Maharaj - Sharad Pawar