...तर नीतेश राणेंना फिरुदेणार नाही
By Admin | Updated: October 19, 2015 23:41 IST2015-10-19T22:50:35+5:302015-10-19T23:41:29+5:30
प्रमोद जठार : राणेंच्या वागण्यामुळे सिंधुदुर्गची इभ्रत चव्हाट्यावर

...तर नीतेश राणेंना फिरुदेणार नाही
वैभववाडी : शिवसेना, भाजपा कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का दिला तरी आमदार नीतेश राणे यांना जिल्ह्यात फिरु देणार नाही, असा इशारा देत राणे आणि समर्थकांच्या वागण्यामुळे सुसंस्कृत सिंधुदुर्गची इभ्रत चव्हाट्यावर आली आहे. ७0 वर्षीय वृद्ध सज्जनराव राणेंचा तुमच्या विरोधात आवाज उठतो. म्हणजे तुमचं सगळंच संपलंय. हे आता ओळखा, अशी टीका करतानाच नम्र रहाल तर मोठे व्हाल, असा सल्ला माजी आमदार प्रमोद जठार यांनी आमदार राणे यांना दिला.
येथील भाजपा कार्यालयात युतीची पत्रकार झाली. यावेळी प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, राजश्री धुमाळे, अशोक रावराणे, राजेंद्र राणे, शिशिर परुळेकर, मंगेश लोके, नंदू शिंदे आदी उपस्थित होते. जठार पुढे म्हणाले, जिल्ह्यातील निवडणूका शांततेत पार पाडाव्यात ही आमची नारायण राणे आणि आमदार नीतेश राणे यांना विनंती आहे. आता आमचे सरकार आहे त्यामुळे दहशतीची भाषा त्यांनी संपविण्याची गरज आहे. सत्तेवर असताना एस. टी. स्थानकाची जागा, उड्डाणपूल हे वैभववाडीचे प्रश्न ते का सोडवू शकले नाहीत? असा सवाल करीत राणेंच्या विकासाच्या थापांवर सिंधुदर्गातील जनता विश्वास ठेवणार नाही, असे स्पष्ट केले.
प्रमोद जठार पुढे म्हणाले, एमआयडीसी प्रकल्प त्यांच्याच कृपेने बंद पडले आहेत. त्यामुळे युती सरकारच्या एक वर्षाच्या कारभारावर बोलण्याचा नारायण राणे यांना तिळमात्र अधिकार नाही. हे सर्व प्रकल्प पाच वर्षात पूर्ण करून विकास कसा करतात ते आम्ही दाखवून देऊ.
संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या परिपूर्ण विकासाचे वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग, विजयदुर्ग बंदर, सी वर्ल्ड, चिपीचे विमानतळ हे महत्त्वाचे प्रकल्प महायुतीचे सरकार पुर्ण करून दाखवेल असा विश्वास व्यक्त करीत राणेंच्या पक्षातील प्रामाणिक आणि सज्जन लोक शिवसेना आणि भाजपात आले आहेत. त्यामुळे वैभववाडी नगरपंचायतीत पहिला नगराध्यक्ष महायुतीचाच बसेल. कणकवली नगरपंचायतीतही लवकरच हर्णे तुताऱ्यांचा बिगुल वाजलेला ऐकायला येईल, असेही शेवटी प्रमोद जठार म्हणाले. (प्रतिनिधी)
राणे एक पैसाही देऊ शकले नाही : जठार
माजी आमदार जठार म्हणाले की, २५ वर्षे सिंधुदुर्गचे नेतृत्व करताना नारायण राणे यांनी जे प्रकल्प आणले ते पूर्ण नव्हे तर काही सुरुही करु शकले नाहीत. राणेंच्या पेन्सील नोंदीमुळे चिपीचा प्रकल्प रखडला, लोकांना धमकावून जादा जमीन मिळवण्याच्या प्रयत्नात सी वर्ल्ड प्रकल्प अडकला, महामार्ग चौपदरीकरणाला एक पैसाही ते देवू शकले नाहीत, असेही जठार यांनी यावेळी सांगितले.