त्यांच्यासाठी रात्र हाच दिवस
By Admin | Updated: October 17, 2016 01:30 IST2016-10-17T01:30:00+5:302016-10-17T01:30:00+5:30
औद्योगिकनगरीत यंत्रांचा खडखडाट सायंकाळ होताच थांबतो.

त्यांच्यासाठी रात्र हाच दिवस
पिंपरी : औद्योगिकनगरीत यंत्रांचा खडखडाट सायंकाळ होताच थांबतो. दिवसभराचे शासकीय व अन्य कार्यालयांचे व्यवहार ठप्प होतात. बाजारपेठेतील दुकानांचे शटर बंद होते. दिवसभर काबाडकष्ट करून थकलेला श्रमिकवर्ग रात्री घरात विश्रांती घेत असतो. अंधार पडून रस्त्यावरील वर्दळ कमी होते. सर्व शहर निद्रिस्त अवस्थेत जाते; त्याच वेळी जगण्याची धडपड करणाऱ्या अनेकांचा रात्रीच्या अंधारातच दिवस सुरू होतो.
कोणत्याही रिक्षा संघटनेचा सदस्य नसल्याने दिवसभर शहरातील कोणत्याही रिक्षातळावर थांबू दिले जात नाही. त्या रिक्षातळाजवळून प्रवासी घेता येत नाही. व्यवसाय तरी कसा करायचा? आठ तासांच्या शिफ्टवर घेतलेल्या रिक्षाचे ठरलेले भाडे रिक्षामालकाला द्यावेच लागणार अशी परिस्थिती असल्याने काही रिक्षाचालकांना अक्षरश: रात्रीचा दिवस करावा लागतो. एक पदवीधर तरुण रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. गोविंदा त्याचे नाव. घरची आर्थिक परिस्थिती बेताची. अशाच खडतर परिस्थितीत कसेबसे शिक्षण केले. नोकरी मिळाली नाही. रिक्षा व्यवसायानेच आधार दिला. परमिट नाही. त्यामुळे स्वत:ची रिक्षा घेता येत नाही. ५०० रुपये आठ तासांची शिफ्ट याप्रमाणे रिक्षामालकाला पैसे द्यावे लागतात. उर्वरित रक्कम स्वत:साठी ठेवायची, असा हा त्याचा नित्यक्रम आहे. रात्रीच्या वेळी बाहेरगावाहून एसटी आणि रेल्वेने आलेले प्रवासी घेऊन जायचे. वाहन मिळत नाही, म्हणून रात्री बसथांब्यावर, रेल्वे स्थानकाजवळ थांबलेले, अडचणीत असलेले हेच रात्रीच्या वेळी अशा रिक्षाचालकांचे ग्राहक असतात, असेही त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
>गर्दुले, पाकीटमार, भिकाऱ्यांचा सहवास
लोणावळा आणि परिसरात भाजीविक्री करणारे अनेक जण रात्री शेवटच्या लोणावळा-पुणे लोकलने पुण्यात भाजी खरेदीसाठी जातात. गुलटेकडी येथे भाजी खरेदी करून पहाटे पुन्हा लोणावळ्याकडे निघतात.
पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या या भाजीविक्रेत्यांना नाईलाजास्तव शेवटच्या लोकलला गर्दुले, पाकीटमार आणि भिकारी यांचा सहवास मिळतो. रात्रीचे शहर अनुभवण्यासाठी बाहेर पडल्यानंतर रात्रीचा दिवस करून जगण्याचा संघर्ष करणारे असे अनेकजण दृष्टिपथास येतात.