सातारा : जिल्ह्यात मागील चार महिन्यांपासून पाऊस सुरूच असून, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरणही शनिवारी सकाळी १०० टक्के भरले. धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तरीही यंदा गतवर्षीपेक्षा १६ दिवस उशिरा धरण भरले. याचबरोबर कोयनेसह इतर पाच प्रमुख प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरल्याने वर्षभराची चिंता मिटलेली आहे.जिल्ह्यात यावर्षी मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला. त्यानंतर जूनमध्येही मान्सूनचा पाऊस जोरदार झाला. तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यातही पर्जन्यमान चांगले झाले. त्यामुळे कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या प्रमुख प्रकल्पांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. त्यातच पावसाचा जोर वाढल्यानंतर या धरणांमधूनच विसर्ग करावा लागला. सध्या सप्टेंबर महिना सुरू असून पूर्व भागात परतीचा पाऊस पडत आहे. तर पश्चिम भागात पावसाची उघडझाप सुरू आहे.शनिवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १, नवजा ४ आणि महाबळेश्वरला ९ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर कोयना धरणात सात हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. त्यातच धरण काठावर आले होते. त्यानंतर सकाळी १० वाजता धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला. त्यामुळे प्रकल्प १०० टक्के भरल्याचे धरण व्यवस्थापनाने जाहीर करून टाकले.तरीही यंदा कोयना धरण भरण्यास उशीर लागला आहे. कारण, मागील वर्षी ४ सप्टेंबरलाच धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला होता. दरम्यान, धरण भरल्याने चार वक्र दरवाजे एक फुटाने उचलून ६ हजार ४०० आणि पायथा वीजगृहातून २ हजार १०० असा एकूण ८ हजार ५०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात केला जात होता.
वर्षभराची चिंता मिटली; महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण १०० टक्के भरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 19:15 IST