चंद्रभागेच्या पात्रात थाटली दुकाने
By Admin | Updated: June 27, 2016 04:36 IST2016-06-27T04:36:02+5:302016-06-27T04:36:02+5:30
चंद्रभागेच्या पात्रात दुचाकी धुऊ नयेत, दशक्रिया विधी करू नये, दुकाने थाटू नयेत असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असतानाही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष

चंद्रभागेच्या पात्रात थाटली दुकाने
सचिन कांबळे,
पंढरपूर- चंद्रभागेच्या पात्रात दुचाकी धुऊ नयेत, दशक्रिया विधी करू नये, दुकाने थाटू नयेत असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असतानाही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने नदीपात्रात राजरोसपणे या घटना घडत आहेत. त्यामुळे चंद्रभागेला प्रदूषणाचा विळखा घट्ट होत असतानाच काही जणांनी नदीपात्रात बेकायदा दुकाने थाटली आहेत़
विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेले वारकरी मोठ्या श्रद्धेने चंद्रभागेत स्नान करतात. नदीतील पाणी तीर्थ म्हणून आपल्या गावी घेऊन जातात; मात्र वारीच्या कालावधीत चंद्रभागेच्या वाळवंटात व नदीपात्राच्या परिसरात घाणीचे साम्राज तयार होते. यामुळे भाविकांचे व शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असते. यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने चंद्रभागा नदीचे प्रदूषण होऊ नये व वाळवंटात घाण होऊ नये, यासाठी काही सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार चंद्रभागेच्या नदीपात्रात वाहने, जनावरे धुण्यास मनाई आहे. त्याचबरोबर हार व फुलांचे साहित्य टाकण्यासाठी कलश ठेवण्यात आले आहेत. तसेच वाळवंटाच्या पात्रात दशक्रिया विधी करण्यास, केस कापण्यास, हॉटेल टाकण्यास, वाहन घेऊन जाण्यास मनाई आहे. वाहने वाळवंटात व पात्रात जाऊ नयेत यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. तरीही अनेक वाहनधारक मार्ग शोधत दुचाकी वाहने वाळवंटात घेऊन जातात.
चंद्रभागेच्या पात्रातील वाळूउपसाही गाढवांच्या साहाय्याने रोज केला जातो. वाळवंटात कचऱ्याचे ढीग साठले आहेत. या सर्व गोष्टींकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने वारकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नियमांची राजरोस पायमल्ली
चंद्रभागेला प्रदूषणाचा विळखा पडलेला असतानाच नदीपात्रात दुकाने थाटण्यात आली आहेत.
वाहने वाळवंटात व नदीच्या पात्रात जाऊ नयेत यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. तरीही अनेक जण वाहने वाळवंटात घेऊन जातात.
वाळूउपसाही केला जातो. नदीच्या पात्रात कचऱ्याचे ढीग साचले आहेत.