वृक्षसंवर्धनासाठी एकवटली वसईतील टेक्नोसेव्ही तरूणाई
By Admin | Updated: July 2, 2016 03:37 IST2016-07-02T03:37:19+5:302016-07-02T03:37:19+5:30
ढासळलेला निर्सगाचा समतोल आणि याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या परीणाम दरवर्षी पावसाच्या आगमनावर होत असतो.

वृक्षसंवर्धनासाठी एकवटली वसईतील टेक्नोसेव्ही तरूणाई
वसई : बेसुमार होणारी जंगलतोड, विकासाच्या नावाखाली झाडांची होणारी कत्तल आणि त्यामुळे ढासळलेला निर्सगाचा समतोल आणि याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या परीणाम दरवर्षी पावसाच्या आगमनावर होत असतो. बेभरवशाच्या पावसामुळे बळीराजाही मेटाकूटीस आलेला आहे. दुष्काळ व पाण्याच्या टंचाईच्या अनेक समस्या सध्या भेडसावत असताना त्यावर फक्त चर्चा न करता वृक्षवल्ली आंम्हा सोयरे वनचरे हा संदेश देत वसईतील तरूणाई सोशल मिडियाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यासाठी पुढे सरसावली आहे.
वसई-विरार महापालिका, शनिमंदिर देवस्थान ट्रस्ट, वसई वैभव टीम, वसई तालुका पत्रकार संघ, वसई बार असोसिएशन यांच्या सहकार्यानी २ जुलै रोजी हा कार्यक्रम वाघोली येथील शिनमंदिराजवळील परीसरात वसई-विरारच्या महापौर प्रविणा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
वृक्षारोपणाच्या या उपक्रमाबद्दल माहिती देताना पर्यावरणमित्र जयवंत नाईक व सामाजीक कार्यकर्ते संतोष पंडीत यांनी सांगीतले की, वृक्षारोपणाचे महत्व प्रत्येकाला समजावे व आपल्या दारी एक तरी झाड लावावे यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. आपल्या हक्काचे एक झाड लावायचा प्रयत्न करण्यासाठी तरूणाई सरसावली आहे ही कौतूकाची बाब आहे.
अभिनेते सयाजी शिंदे यांनीही सोशल मिडीयावरून वृक्षारोपणासाठी तरूणांना साद घातली होती. याच तरूणांच्या सहकार्याने ५० एकर ओसाड माळरानावर सह्याद्री देवराई फूलवणार आहेत, आपली निसर्गसंपन्न वसई हि मुळातच हिरवीगार आहे. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करून ती आणखीन सुंदर तर होणारच आहे, सोबत निर्सगाचा समतोलही राखला जाणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. (वार्ताहर)
>प्रसादातून हिरवाईचा निरोप
शनीमंदिर वाघोली ट्रस्टने वृक्षसंवर्धनाचे महत्व जाणून गेल्या काही वर्षात जवळ - जवळ पाच लाखाहूनही अधीक फळ व फूलझाडांचे वाटप केलेले आहे. दर शनिवारी शनीमंदिरात येणाऱ्या भाविकांना तुळस,जास्वंद व इतर झाडांची रोपे प्रसाद म्हणून देत असतात.