शिक्षकांचा पगार ही विद्यार्थ्यांवर होणारी गुंतवणूक
By Admin | Updated: June 5, 2015 23:47 IST2015-06-05T23:47:14+5:302015-06-05T23:47:14+5:30
अकोला येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी साधला मुख्याध्यापकांशी संवाद.

शिक्षकांचा पगार ही विद्यार्थ्यांवर होणारी गुंतवणूक
अकोला : राज्य शासनातर्फे दरवर्षी ४२ हजार कोटी रुपये शिक्षकांच्या पगारावर खर्च होतात. शासनाने विद्यार्थ्यांवर केलेली ही गुंतवणूक आहे. शासन ही गुंतवणूक विद्यार्थी विकासाच्या माध्यमातून शिक्षकांकडून वसूल करणार असल्याचे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी येथे केले. अकोला जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि शिक्षणक्षेत्रातील विविध संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेवानवृत्त मुख्याध्यापक व गुणवंत विद्यार्थ्यांंच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी नवृत्त मुख्याध्यापक आणि गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तावडे म्हणाले, सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांंचा उत्साह आहे का, शिक्षकांना विद्यार्थ्यांंचे भविष्य घडविण्यात कितपत रस आहे, हा गंभीर प्रश्न आहे. आजच्या काळात शिक्षकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी शिक्षणक्षेत्राची निवड केली असून, विद्यार्थ्यांंच्या शैक्षणिक विकासाची तळमळ मनातून हरविली आहे. संस्थांना अनुदान, पगारवाढ, शिक्षकांना सेवेत सामावून घेण्यासाठी अनेक निवेदने येतात. यातील दहा मागण्यांपैकी किमान चार मागण्या तरी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असाव्यात; परंतु शिक्षकांनी दिलेल्या निवेदनामध्ये एकही मागणी विद्यार्थ्यांंसाठी नसणे ही दुर्दैवाची बाब आहे. यात विद्यार्थ्यांचेच नुकसान आहे. त्यामुळे या शिक्षण पद्धतीत बदल करणे आवश्यक असल्याचे तावडे म्हणाले.