लक्ष्य विधानसभा : धुळे ग्रामीणमध्ये उमेदवारीसाठी दहाजण इच्छुक
By Admin | Updated: June 1, 2014 00:09 IST2014-06-01T00:09:01+5:302014-06-01T00:09:01+5:30
धुळे : मोदी लाटेने धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचेही वारे फिरविले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखालील जवाहर गटाने सावध पवित्रा घेतला आहे.

लक्ष्य विधानसभा : धुळे ग्रामीणमध्ये उमेदवारीसाठी दहाजण इच्छुक
धुळे : मोदी लाटेने धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचेही वारे फिरविले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या नेतृत्वाखालील जवाहर गटाने सावध पवित्रा घेतला आहे. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला, मोदी लाटेला कसे सामोरे जायचे, याचा विचार जवाहर गट व इतर इच्छुक उमेदवारही करत आहेत. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार प्रा. शरद पाटील, उपजिल्हाप्रमुख हिलाल माळी, प्रा.अरविंद जाधव, काँग्रेसतर्फे रोहिदास पाटील, कुणाल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे म्हाडाचे विभागीय माजी सभापती किरण शिंदे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील, पंचायत समितीच्या सभापती व राष्ट्रवादीच्या सदस्या ज्ञानज्योती भदाणे तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष गजानन पाटील इच्छुक उमेदवार असतील. यातही ‘व्हॉटस्- अॅप’वर भावी आमदार कुणाल पाटील, किरण शिंदे, किरण पाटील असा प्रचार सुरू झाला आहे. त्यामुळे रंगत वाढत आहे. दरम्यान, रोहिदास पाटील यांनी राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी फिल्डिंग लावल्याने कुणाल पाटील उमेदवार राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. धुळे ग्रामीण (पूर्वीचा कुसुंबा) विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. यात २००९ ला झालेल्या फेरपुनर्रचनेत या मतदारसंघाचेही फासे उलटले. काँग्रेसकडील हा मतदारसंघ शिवसेनेने हिरावून घेतला. आता केंद्रात मोदी सरकार आल्याने त्यासंबंधी लाटेने धुळे ग्रामीण मतदारसंघात काँग्रेस आघाडीची झोप उडविली आहे. शिवसेनेची ‘क्रेझ’ कमी होत असताना तिला ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी लाटेने तारले आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे आमदार प्रा.शरद पाटील नेतृत्व करीत आहेत. त्यांनी माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा गेल्या निवडणुकीत पराभव केला आहे. त्याचे येत्या निवडणुकीत उट्टे काढण्याचे मनसुबे आणि राजकीय खेळी काँग्रेसकडून खेळली जात असताना मोदी लाटेने त्यावर तूर्त पाणी फिरविले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धुळे ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अमरिशभाई पटेल यांना ५१ हजार ६६०, तर महायुतीचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांना विक्रमी १ लाख ३० हजार १०२ मते मिळाली आहेत. या मतदारसंघातील पूर्वीचा मतांचा आलेख पाहिला, तर रोहिदास पाटील यांची सरासरी ८० ते ८२ हजार पक्की मते आहेत. त्या तुलनेत पटेल यांना ५१ हजार मते मिळालीत. आमदार प्रा.पाटील यांना गेल्या निवडणुकीत १ लाख ५ हजार ६२ मते मिळाली होती. त्यापेक्षा डॉ.भामरे यांना अधिक म्हणजे १ लाख ३० हजार १०२ मते मिळाली आहेत. तुलनात्मक ही सांख्यिकीय माहिती पाहिली, तर मोदी लाटेच्या सहकार्यामुळे प्रा.पाटील यांनी २५ हजार मते वाढविल्याचे दिसते. याउलट माजी मंत्री पाटील यांच्या मतसंख्येत ३१ हजाराने घट झाल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर जवाहर गटाने येत्या विधानसभा निवडणुकीबाबत सावध पवित्रा घेत मोदी लाटेसह शिवसेना व इतर स्पर्धक इच्छुक उमेदवारांना कसे तोंड द्यायचे, यासाठी डावपेच सुरू केले आहेत.