घुमान संमेलनात खवय्यांची चंगळ !
By Admin | Updated: March 24, 2015 00:31 IST2015-03-24T00:31:26+5:302015-03-24T00:31:26+5:30
हापूस आमरस, दुधी हलवा, केशर जिलेबी, भरलं वांग, मटकीची उसळ हा कोणत्या लग्नाचा मेनू आहे असे वाटले ना! पण थांबा, हा मेनू आहे,

घुमान संमेलनात खवय्यांची चंगळ !
पुणे : हापूस आमरस, दुधी हलवा, केशर जिलेबी, भरलं वांग, मटकीची उसळ हा कोणत्या लग्नाचा मेनू आहे असे वाटले ना! पण थांबा, हा मेनू आहे, घुमानच्या साहित्य संमेलनाचा. यंदाचे संमेलन पंजाबात होत असल्यामुळे मकई की रोटी, सरसोंका सार, छाछ्, अशी काहीशी तिथली ‘स्पेशालिटी’ अनुभवायला मिळेल, असे वाटले होते. मात्र काही निवडक पंजाबी पदार्थ सोडले तर संमेलनात रसिकांना महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ मिळणार आहेत. पण काहीही झाले तरी चंगळ होणार आहे ती मात्र खवय्यांची.
कोणत्याही ठिकाणी जायचे म्हटले, की सर्वप्रथम तिथली खाण्याची खासियत काय आहे हे पाहिले जाते. संमेलनात तर हमखास मेनू काय आहे, याविषयीच्या चर्चेला उधाण येते. म्हणूनच यंदा संमेलनाच्या इतिहासात प्रथमच आयोजकांनी रसिकांच्या तोंडाला पाणी सुटेल अशी काहीशी शक्कल लढवीत घुमानच्या संमेलनातील तीन दिवसांचा मेनू आधीच जाहीर केला आहे. (प्रतिनिधी)
रेल्वेचे वेळापत्रक जाहीर
४या संमेलनासाठी मुंबई ते बियास ‘संतश्रेष्ठ नामदेव एक्स्प्रेस’ आणि नाशिक रस्ता ते उमर तांडा ‘श्री गुरुनानकदेवजी एक्स्प्रेस’ या दोन रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांसाठी या पूर्वीच ज्या प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे त्यांना २५ मार्च रोजी त्यांचे आरक्षण आॅनलाईन पाहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
शेवटच्या दिवशी हापूस आमरस
४दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणात बासुंदी, मोतीपाक, भरलं वांग, टोमॅटो कोबीची भाजी, आमटी-भात तर रात्रीच्या जेवणात दिलजानी, कांदा भजी, फ्लॉवर-बटाट्याची कोरडी भाजी, हे पदार्थ असणार आहेत. तर शेवटच्या दिवशी दुपारी हापूस आमरस, मिक्स भाजी, चवळी मसाला, कुरडई, बुंदी रायता आणि रात्री मूग हलवा, पिठले, मसाले भात, कॉर्न पॅटीस या पदार्थांची मेजवानी असणार आहे.
स्मरणिकेमध्ये एकही जाहिरात नाही
४मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी सुरू असलेल्या पायाभूत प्रयत्नांबाबत तज्ज्ञांच्या लेखांनी समृद्ध असलेल्या ‘अभिजात’ स्मरणिकेचे प्रकाशन मंगळवारी सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते होणार आहे. या स्मरणिकेची पाने मराठी भाषेचा विकास, भाषा धोरण आणि शासन, भाषा अभिजात का आहे याचे संदर्भ, स्पष्टीकरण, विश्लेषण, वारकरी संप्रदाय आदी विविध विषयांनी नटलेली आहेत. स्मरणिकेमध्ये एकही जाहिरात नाही, हेच यंदाच्या स्मरणिकेचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे.