कृषी विभागातील बदल्यांना स्थगिती
By Admin | Updated: June 5, 2015 01:54 IST2015-06-05T01:54:52+5:302015-06-05T01:54:52+5:30
गट ‘अ’ दर्जाच्या ३८९ अधिकाऱ्यांच्या बदल्या उपसचिव श्रीमती सी. एन. सूर्यवंशी यांनी सचिव, राज्यमंत्री आणि मंत्र्यांना अंधारात ठेवून करण्यात आल्याचे उघडकीस आले.
कृषी विभागातील बदल्यांना स्थगिती
अतुल कुलकर्णी - मुंबई
कृषी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागातील गट ‘अ’ दर्जाच्या ३८९ अधिकाऱ्यांच्या बदल्या उपसचिव श्रीमती सी. एन. सूर्यवंशी यांनी सचिव, राज्यमंत्री आणि मंत्र्यांना अंधारात ठेवून करण्यात आल्याचे उघडकीस आले. शिवाय, एकाच अधिकाऱ्याच्या दोन-दोन ठिकाणी बदली आणि निवृतीच्या उंबरठ्यावर असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करण्याचे प्रतापही घडल्याने मोठा असंतोष निर्माण होताच सगळ्या बदल्या तातडीने स्थगित करण्यात आल्या आहेत.
या प्र्रकरणी उपसचिव श्रीमती सूर्यवंशी यांची उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री एकनाथ खडसे यांनी ‘लोकमत’ला दिली.
कृषी, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागातील ३८९ बदल्यांपैकी २०२ बदल्या प्रशासकीय कारणासाठी करण्यात आल्याचे बदली आदेशात नमूद केले असले तरी उर्वरित १८७ बदल्या विनंतीवरून करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यातही काही अधिकाऱ्यांच्या मते त्यांच्याकडून तुमच्या आवडीचे ठिकाण देतो असे सांगून विनंती अर्ज लिहून घेतले गेले; मात्र प्रत्यक्षात दुसऱ्याच ठिकाणी बदल्या केल्या गेल्या आहेत. याबद्दल पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त ए.टी. कुंभार यांना विचारले असता ते म्हणाले, शासनाकडे वर्ग १च्या बदल्या करताना काही चुका झाल्या आहेत. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, काहींचा कार्यकाळ चुकीचा मोजला गेला
आहे, त्यामुळे सचिवांच्या आदेशानुसारच आपण बदल्यांचे आदेश थांबवले आहेत.
सध्या बदलीइच्छुकांच्या गर्दीने मंत्रालय गच्च भरून गेले आहे. प्रत्येक मंत्र्याच्या दालनापुढे गर्दीच गर्दी
असून, आमदारांच्या शिफारस पत्रांचा पाऊस पडत आहे. पशुसंवर्धन विभागाच्या बदल्यांमध्ये तर ‘धर्मा’धिकार वापरून अर्थपूर्ण व्यवहार झाल्याची चर्चा आहे.
याबाबत आयुक्त कुंभार म्हणाले, बदल्यांसाठी, शासकीय कामासाठी कोणी पैसे मागत असेल तर तुम्ही स्टिंग आॅपरेशन करून मला माहिती द्या, फोटो द्या असे आवाहन आम्ही केले आहे. कोणी तसे पुढे आले तर नक्की कारवाई करू. मात्र गट १च्या बदल्या मंत्रालय स्तरावर झालेल्या असल्यामुळे त्यावर मी बोलणे योग्य होणार नाही.
या बदल्या आम्हाला कोणालाही न विचारता केल्या गेल्या आहेत. उपसचिव सूर्यवंशी बार्इंनी या बदल्या केल्या होत्या. त्यातल्या अनियमितता व गंभीर चुका लक्षात घेता दुरुस्तीचे आदेश दिले असून, सूर्यवंशी यांची बदली केली आहे. त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.- एकनाथ खडसे, पशुसंवर्धन मंत्री