‘रंकाळ्या’ची यशस्वी लढाई

By Admin | Updated: August 16, 2016 01:28 IST2016-08-16T01:28:26+5:302016-08-16T01:28:26+5:30

दहावीपर्यंत शिकलेल्या एका शेतकऱ्याने कोल्हापूरचे वैभव असलेला ‘रंकाळा’ तलाव वाचविण्यासाठी सुरू केलेल्या लढाईला चांगले यश आले आहे. भोसलेवाडीतील सुनील कुंडलिक

Successful battle of 'Rankala' | ‘रंकाळ्या’ची यशस्वी लढाई

‘रंकाळ्या’ची यशस्वी लढाई

- विश्वास पाटील,  कोल्हापूर

दहावीपर्यंत शिकलेल्या एका शेतकऱ्याने कोल्हापूरचे वैभव असलेला ‘रंकाळा’ तलाव वाचविण्यासाठी सुरू केलेल्या लढाईला चांगले यश आले आहे. भोसलेवाडीतील सुनील कुंडलिक केंबळे यांनी स्वखर्चाने पुण्यातील हरित लवादाकडे प्रदुषणासंदर्भात दावा दाखल केला. लवादाच्या दणक्यामुळे रंकाळ्याचे प्रदूषण रोखण्यात त्यांना चांगले यश आले. सामान्य माणूसही कित्येक वर्षे रखडलेला प्रश्न कसा मार्गी लावू शकतो, हेच त्यांच्या धडपडीतून स्पष्ट झाले.
रंकाळा तलावास आलेली मरणासन्न कळा व त्याचे घाणेरडे स्वरूप पाहून करवीरवासी अस्वस्थ होतात. तलावाच्या काठाने झालेली बेबंद बांधकामे व त्यातून येणारे सांडपाणी थेट रंकाळ््यात मिसळत असताना महापालिकेने त्याकडे कानाडोळा केला होता. पर्यावरणप्रेमीही त्याविरोधात सातत्याने आवाज उठवत होते; परंतु रंकाळा स्वच्छ होत नसल्याने केंबळे यांनी हा विषय लावून धरण्याचे ठरविले. राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केल्यानंतर त्यांना अनेकांनी खुळ््यात काढले. अगोदर आयुक्तांकडे तक्रार अर्ज दे जा, असाही सल्ला काहींनी दिला; परंतु त्याचवेळी रंकाळा तलाव प्रदूषण मुक्तीचा महापालिकेने तब्बल १२५ कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल तयार केला होता. तो मंजुरीच्या टप्प्यात होता. त्यामुळे आपण विलंब केला तर या पैशांची उधळपट्टी होईल, असे वाटल्याने केंबळे यांनी थेट लवादाकडे दाद मागितली.
महापालिकेने आपण रंकाळा तलाव प्रदूषण मुक्तीसाठी ८ कोटी रुपये खर्च केले आहेत व आता १२५ कोटीचा खासगी कंपनीद्वारे विस्तृत प्रकल्प अहवाल करून तो केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून प्रकल्पांतर्गत निधी मिळवून प्रदूषण रोखण्यात येणार असल्याचे लवादाला सांगितले. पण न्यायाधीश किंगावकर व तज्ज्ञ सदस्य अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने महापालिकेच्या भूमिकेवर अविश्वास दाखविला व ८ कोटी खर्च झाले असताना पुन्हा १२५ कोटींची गरजच काय, अशी विचारणा महापालिकेला केली. आधीच्या कामाची चौकशी होईपर्यंत केंद्र सरकारने महापालिकेस निधी देऊ नये, असे बजावले.
बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या पर्यावरण विभागास प्रकल्पाचे तांत्रिक व पर्यावरणीय लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले. त्यांनी १२५ कोटी रुपयांच्या कामाची गरज नसल्याचा अहवाल दिल्यावर महापालिकेने तो प्रकल्पच सोडून देत प्रदूषणमुक्तीची ५ कोटींची कामे प्रस्तावित केली.
प्रदूषण रोखण्याबद्दल काय केले, हे लवादास प्रत्येक तारखेस सांगावे लागत असल्याने महापालिकेने युद्धपातळीवर यंत्रणा राबवून रंकाळ््यात मिसळणारे सांडपाणी बंद केले. त्याचा चांगला परिणाम झाला. रंकाळा स्वच्छ झाला. उन्हाळ््यात कोणत्याही प्रकारची दुर्गंधी अथवा ब्लू ग्रीन अल्गी या वनस्पतीचा प्रार्दुभाव दिसला नाही. हरित लवाद सध्या सर्व प्रक्रियेवर देखरेख ठेवून आहे.

वकिलांची फी व तत्सम कामावर केंबळे यांचे लाखभर रुपये खर्च झाले आहेत. ही फी देणे शक्य होईना म्हणून स्वत: केंबळे यांनीच मागच्या चार तारखांना लवादापुढे बाजू मांडली. त्यासाठी त्यांनी या सगळ्या प्रकरणाचा अभ्यास केला.

रंकाळ््याबद्दल मनापासून प्रेम आहे. त्याची अवस्था पाहून अस्वस्थ होतो. त्याचे प्रदूषण रोखण्यासाठी आपणच काहीतरी केले पाहिजे असे वाटल्याने ही लढाई लढलो. त्यात यशस्वी झाल्याचे वेगळे समाधान आहे.
- सुनील कुंडलिक केंबळे

Web Title: Successful battle of 'Rankala'