पोटनिवणुकीत वांद्र्यात ४२ टक्के तर तासगावमध्ये ५३टक्के मतदान
By Admin | Updated: April 11, 2015 18:50 IST2015-04-11T12:08:36+5:302015-04-11T18:50:49+5:30
पूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या वांद्रे पोटनिवडणुकीत एकूण ४२ टक्के तर तासगावमध्ये ५३ टक्के मतदान झालेे.

पोटनिवणुकीत वांद्र्यात ४२ टक्के तर तासगावमध्ये ५३टक्के मतदान
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या वांद्रे पोटनिवडणुकीत एकूण ४२ टक्के मतदान झालेे तर तासगाव-कवठेमहांकाळच्या निवडणुकीत ५३ टक्के मतदान झाले आहे. वांद्रयात सकाळी ८ वाजल्यापासून मतदान सुरू झआले. मतदार मोठया प्रमाणावर घराबाहेर पडून मत नोंदवत होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्नी रश्मी ठाकरे व मुलगा आदित्यसह मतदानाचा हक्क बजावला. तर तासगावमध्ये आर. आर. पाटील यांच्या पत्नी समुनताई पाटील, मुलगी यांनीही मतदान केले. तासगावकरांवर आपला पूर्ण विश्वास असून ही निवणूक सहानुभूतीची नव्हे तर आपुलकीची असल्याचे सुमनताईंनी सांगितले. वांद्र्यात अनेक सेलिब्रिटीनींही मतदानाचा हक्क बजावला. अभिनेत्री मनवा नाईकने आईसह तर अभिनेता मिलिंद गुणाजीने पत्नीसह मतदान केले.
दरम्यान मतदान सुरू असतानाच मतदारसंघात मुक्तपणे फिरून आचारसंहितेचा भंग करणारे नारायण राणे यांचे पुत्र निलेश व नितेश राणे तसेच सेना खासदार विनायक राऊत आणि एमआयएमचे आमदार वरिस पठाण यांनाही आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले.
निलेश व नितेश राणे यांच्या अटकेनंतर वांद्र्यातील वातावरण तापले होते. मुलांना ताब्यात घेतल्याचे समजताच त्यांच्या सुटकेसाठी नारायण राणेंनी पोलिस स्थानकात धाव घेतली. आज मतदान सुरू झाल्यानंतरही नितेश व निलेश मतदारसंघात फिरत होते. आचारसंहितेच्या नियमांनुसार सुरक्षारक्षकासह मतदारासंघात फिरण्यास मनाई आहे. मात्र तरीही नितेश राणे सुरक्षारक्षकांसह तर निलेश राणे कार्यकर्त्यांसह फिरत होते. त्यामुळे पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतले. हे वृत्त कळताच नारायण राणेंनी मुलांना सोडवण्यासाठी नारायण राणे पोलिस स्थानकांत दाखल झाले. शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यामुळेच ते सत्तेचा दुरूपयोग करत असल्याचा आरोप राणेंनी केला. तसेच उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर पोलिसांनी कारवाई का केली नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या वांद्रे (पू.) मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना शिवसेनेने तिकीट दिले आहे. त्यांच्यात आणि काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यामध्ये खरी चुरस आहे. तृप्ती सावंत व शिवसेनेला आव्हान देत नारायण राणे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
तसेच माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे तासगाव-कवठेमहांकाळची पोटनिवडणूक होत असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस वगळता अन्य कुठल्याही राजकीय पक्षाने उमेदवार दिलेले नाहीत, तरीही आर. आर. पाटील यांच्या पत्नी राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमनताई पाटील यांच्यापुढे ८ अपक्षांचे आव्हान आहे. त्यात भाजपाचे बंडखोर उमेदवार स्वप्निल पाटील यांचा समावेश आहे.