उपराजधानी शोकसंतप्त

By Admin | Updated: September 4, 2014 00:58 IST2014-09-04T00:58:02+5:302014-09-04T00:58:02+5:30

अपहरणकर्त्यांनी चिमुकल्या युग मुकेश चांडक (वय ८) या बालकाची हत्या केल्याचे समजल्याने अवघी उपराजधानी शोकसंतप्त झाली आहे. निरागस युगच्या मारेकऱ्यांना आमच्या हवाली करा, अशी मागणी करीत

Sub-state mourning | उपराजधानी शोकसंतप्त

उपराजधानी शोकसंतप्त

मारेकऱ्यांना ताब्यात देण्याची मागणी
नागपूर : अपहरणकर्त्यांनी चिमुकल्या युग मुकेश चांडक (वय ८) या बालकाची हत्या केल्याचे समजल्याने अवघी उपराजधानी शोकसंतप्त झाली आहे. निरागस युगच्या मारेकऱ्यांना आमच्या हवाली करा, अशी मागणी करीत हजारोंच्या संख्येतील शोकसंतप्त नागरिकांनी पहाटे ३पर्यंत युगचे निवासस्थान आणि लकडगंज ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, युगची हत्या करणाऱ्या राजेश धन्नालाल दवारे (वय १९) आणि अरविंद अभिलाष सिंग (वय २३) या क्रूरकर्म्यांना पोलिसांनी अटक केली. एखाद्या सराईत गुन्हेगारालाही मागे टाकावे असे थरारक कृत्य या क्रूरकर्म्यांनी केले आहे. अटक करण्यात आल्यापासून त्यांनी पोलिसांना दिलेली माहिती थरकाप उडविणारी आहे.
क्रूरकर्म्याचा मोबाईल खणखणला
पाटणसावंगी मार्गावर पोहचताच क्रूरकर्मा राजेश दवारेचा मोबाईल वाजला. फोन पोलिसांचा होता. (डॉक्टर मुकेश यांनी युगचे अपहरण झाल्याची शंका पोलिसांकडे वर्तविल्याने आणि युगला आपल्या क्लिनिकमधील कर्मचाऱ्यासारखा दिसणाऱ्या एकाने सोबत नेल्याचे सांगितल्याने पोलिसांनी डॉ. चांडक यांच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांशी संपर्क करून त्यांना ठाण्यात येण्यास सांगितले होते.) पोलिसांनी लकडगंज ठाण्यात बोलविल्यामुळे क्रूरकर्मा राजेश चमकला. आपल्याला अपहरण करताना कुणी बघितले तर नाही ना, अशी शंका त्याच्या मनात आली. मात्र, त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. अरविंदला तातडीने निर्जन ठिकाणी चलण्यास सांगितले. त्यानुसार त्या दोघांनी अर्धबेशुध्दावस्थेतील युगला घटनास्थळी नेले. तेथे त्याचा गळा आवळला, नाकतोंड दाबले आणि तो ठार झाल्याची खात्री पटल्यानंतर युगचा मृतदेह पुलाखाली लपवला. यानंतर हे कू्ररकर्मा नागपुरात पोहचले. कू्ररकर्मा राजेश लकडगंज ठाण्यात पोहचला. आपल्याला काही माहीत नाही, आपला काही संबंध नाही, असे म्हणत त्याने लकडगंज पोलिसांची दिशाभूल केली. २४ तासानंतर त्याने तोंड उघडून अपहरण आणि हत्येची कबुली दिली.
अन् सुरू झाला थरार...
क्रूरकर्मा अरविंद आणि राजेशने चिमुकल्या युगचे अपहरण हत्या करण्याच्या उद्देशानेच केले. लाल टीशर्ट घातलेल्या अरविंदने युगला आपल्या स्कूटीवर बसवले. ठरल्याप्रमाणे समोरच्या चौकात अरविंद उभा होता. तो स्कूटीवर बसला. ते रेल्वे क्रॉसिंगवरून राणी दुर्गावती चौकात आले. तेथे त्यांनी जागा बदलवली. क्रूरकर्मा राजेशने स्कूटी हातात घेतली. मध्ये युगला बसवले तर, मागे अरविंद बसला. स्कूटी पुढे निघताच अरविंदने युगच्या नाकातोंडावर क्लोरोफॉर्म लावलेला रुमाल ठेवला. पकड घट्ट केली. परिणामी युग अर्धबेशुद्ध झाला. त्याच अवस्थेत त्याला घेऊन हे क्रूरकर्मे शहरात तास-दीड तास फिरले. नंतर कोराडी मार्गाकडे वळले.
मोटीव्ह रिव्हेन्ज
युगच्या अपहरण आणि हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार राजेश दवारे हा कळमन्यातील वांझरी लेआऊटमध्ये किराणा दुकानाजवळ राहतो. तो डॉ. चांडक यांच्या क्लिनिकमध्ये कर्मचारी होता. रुग्णांकडून तो जास्त रक्कम (तपासणी फी) उकळायचा. संगणकाच्या नोंदीतही तो चुकीची माहिती नोंदवायचा. चिमुकला युग कमालीचा हुशार होता. तो अधूनमधून क्लिनिकमध्ये जायचा. वेळ मिळताच संगणकावरही खेळायचा. खेळता खेळताच एकदा राजेशची बनवाबनवी युगने उघड केली. डॉ. मुकेश चांडक यांना राजेशची माहिती कळताच त्यांनी त्याला झापले आणि कामावरून काढून टाकले. यावेळी डॉ. मुकेश यांना या क्षुल्लक घडामोडीची भयावह किंमत चुकवावी लागेल, याची तसूभरही कल्पना नव्हती.
कॉन्स्टेबल तितरे यांची कमाल
युगला कायमचे संपवून राजेश आणि अरविंद हे १ सप्टेंबर रोजी सायंकाळी आपापल्या घरी परतले होते. दरम्यान शिकवणी वर्गाची वेळ होऊनही युग परतला नसल्याने मातेने आपले पती डॉ. मुकेश चांडक यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली. क्षणात धोका लक्षात येऊन त्यांनी लकडगंज पोलिसांशी संपर्क साधला होता. पोलिसांनी डॉ. चांडक यांच्या क्लिनिकमधील सर्व उपलब्ध कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले होते. राजेश दवारे यालाही मोबाईलवर संपर्क करून पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. चौकशीत त्याने युगचे अपहरण झाल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले होते. आपल्याला काहीही माहीत नाही, अशा तोऱ्यात तो होता. इतर कर्मचाऱ्यांच्या आणि राजेशच्या चेहऱ्यावरील हावभावात तफावत दिसत होती. त्यामुळे पोलिसांची राजेशवरील शंका बळावली होती. परंतु त्याच वेळी पोलिसांची दिशाभूल करण्याच्या हेतूने अरविंद सिंग याने युगच्या वडिलांना फोन १० खोके (कोटी)ची मागणी केली होती. फोन करणाऱ्याने स्वत:चे नाव मोहसीन सांगितले होते. त्यामुळे युगचे अपहरण करणारे वेगळेच असा समज निर्माण झाला होता. पोलिसांनी राजेशला सोडून देऊन पुन्हा आपली शोधमोहीम सुरू केली होती. काही वेळानंतर पुन्हा राजेशला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. तो काहीही सांगत नव्हता. अचानक तितरे नावाचे कॉन्स्टेबल आले. त्यांनी आपल्या अधिकाऱ्याला राजेशची विचारपूस करण्याची परवानगी मागितली. तितरे यांनी राजेशला बाजूला नेऊन आपला पोलिसी हिसका दाखवताच तो पोपटासारखा बोलता झाला. त्याने चक्क युगच्या खुनाची कबुलीच दिली होती.
१५ पर्यंत पीसीआर
तपास अधिकारी लकडगंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.के. जयस्वाल यांनी आज आरोपी राजेश दवारे आणि अरविंद सिंग यांना बुरख्यात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात हजर केले. सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयाला घटनेची माहिती देण्यात आली. या आरोपींचा १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात यावा, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली.
अधिक आरोपींची शक्यता
सरकार पक्षाच्या वतीने आरोपींच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी करताना न्यायालयाला असे सांगण्यात आले की, या जघन्य अपराधामध्ये या आरोपींसह इतर अधिक आरोपी असण्याची दाट शक्यता आहे. त्याबाबत सविस्तर तपास करून आरोपी निष्पन्न करणे आहे. मृत बालकाच्या अंगावरील बेपत्ता शर्ट आरोपींकडून जप्त करणे आहे. घटनेवेळी एका आरोपीने घातलेले लाल रंगाचे टी शर्ट जप्त करणे आहे. या गुन्ह्याच्या मागील निश्चित कारण जाणून घेणे आहे. गुन्ह्याचा कट आणि उद्देश निष्पन्न करणे आहे. बालकाच्या अपहरणासाठी वापरलेले वाहन आणि मोबाईल जप्त करणे आहे. मृत बालकास कोठे कोठे नेले त्याबाबत शोध घेऊन पुरावे गोळा करणे आहे.
लकडगंज ते सदर
डॉ. चांडक यांनी क्लिनिकमधील कर्मचाऱ्यांसमोर अपमानित करून कामावरून काढून टाकल्याच्या कारणामुळे हे भयावह अपहरण-हत्याकांड केल्याचे क्रूरकर्म्यांनी सांगितले आहे. त्यांनी अपहरण करून हत्या केल्याची आणि युगचा मृतदेह पाटणसावंगी - लोणखैरी मार्गावर लपवून ठेवल्याची कबुली देताच पोलिसांना पुढचा सर्वच घटनाक्रम नजरेसमोर आला. जनभावना तीव्र होऊ शकतात, जमाव या क्रूरकर्म्यांवर प्रसंगी हल्लाही करू शकतो, हेसुद्धा ध्यानात आले. त्यामुळे लकडगंज पोलिसांनी क्रूरकर्मा राजेश आणि अरविंदला घटनास्थळावरूनच गुन्हेशाखेत नेले. तेथे त्यांची रात्रभर चौकशी करण्यात आली. आज भल्या सकाळी या क्रूरकर्म्यांना सदर पोलीस ठाण्याच्या कोठडीत डांबण्यात आले. इकडे लकडगंज परिसरात प्रचंड संतापाचे, तणावाचे वातावरण असल्यामुळे जमाव न्यायालय परिसरातही येऊ शकतो, हे ध्यानात घेऊन पोलिसांनी कोर्टाच्या कामकाजाच्या पहिल्याच तासात त्यांना न्यायालयात हजर करून झटपट पीसीआर मिळवला.
लिगल एडमार्फत आरोपीला नेमून दिला वकील
न्यायालयाने आरोपींना वकील नियुक्त केला काय, अशी विचारणा करताच त्यांनी वकील नेमला नसल्याचे सांगितले. त्यावर सरकार पक्षाच्या वतीने असे सांगण्यात आले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आरोपीला लिगल एडमार्फत वकील उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतो. यावर न्यायालयाने लिगल एड मार्फत अ‍ॅड. साळुंके यांची या आरोपींचे वकील म्हणून नियुक्ती केली. दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

Web Title: Sub-state mourning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.