मुंबई - राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीतील एक कोटी एक लाख विद्यार्थ्यांसाठीची पाठ्यपुस्तके शिक्षण विभागाने शाळांमध्ये पोहोचवली असून, त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था व्यवस्थापन आणि खासगी अनुदानित व्यवस्थापन शाळांमधील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
समग्र शिक्षा योजनेंतर्गत राज्यातील १ कोटी १ लाख २ हजार ८५ विद्यार्थ्यांसाठी शासनाने ३१३ कोटी ७२ लाख ५८ हजार रुपये मंजूर केले होते. नवीन अभ्यासक्रमानुसार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) पुस्तकांची छपाई केली आहे. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, तेलगू, तमिळ, कन्नड, सिंधी आणि बंगाली या भाषांतील पुस्तकांचा समावेश आहे. पाठ्यपुस्तकांची वाहतूक दोन टप्प्यांमध्ये शिक्षण विभागाने केली. ९ जूनपर्यंत एकूण ९९.५३% पुस्तके तालुकास्तरावर पोहोचलेली असून, तालुक्याच्या ठिकाणाहून प्रत्येक शाळेमध्ये हे पुस्तक १६ जूनपर्यंत वाटप केले जाणार आहेत.