सामरिक व्यापार, जहाज उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा
By Admin | Updated: April 4, 2017 03:20 IST2017-04-04T03:20:48+5:302017-04-04T03:20:48+5:30
सामरिक व्यापार क्षेत्रात अनेक रोजगार, स्वयंरोजगार, तसेच उद्योगाच्या संधी आहेत

सामरिक व्यापार, जहाज उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा
मुंबई : सामरिक व्यापार क्षेत्रात अनेक रोजगार, स्वयंरोजगार, तसेच उद्योगाच्या संधी आहेत, परंतु बहुतांश विद्यार्थ्यांना व युवकांना त्याबद्दल पुरेशी माहिती नाही. याकरिता सामरिक प्रशिक्षण संस्था, तसेच विद्यापीठांमध्ये सहकार्य वाढवावे, असे सांगतानाच सामरिक व्यापार व जहाज उद्योग या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा, अशी अपेक्षा राज्यपाल विद्यासागर राव यांनी व्यक्त केली.
५४ वा राष्ट्रीय सामरिक दिन, तसेच मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उद्घाटन राज्यपालांचे हस्ते सोमवारी राजभवन येथे झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. भारत एक सामरिक राष्ट्र असून, देशाला हजारो वर्षांची सामरिक दळण-वळण व व्यापाराची परंपरा लाभली आहे. अठराव्या शतकात मुंबईत जहाज बांधणी उद्योग आला व या ठिकाणी भारतीयांनी अनेक व्यापारी व युद्धनौकांची निर्मिती केली. आजदेखील माझगाव गोदी येथे युद्धनौका व पाणबुड्या तयार केल्या जातात. शहराचा हा समृद्ध वारसा जनतेपुढे यावा, याकरिता मुंबई येथे सामरिक व जहाजबांधणी इतिहासाचे अत्याधुनिक संग्रहालय निर्माण करावे, अशी सूचना राज्यपाल यांनी केली.
वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबई शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडला असून, लवकरात लवकर जलवाहतूक सुरू व्हावी व सर्व संबंधितांनी सहकार्य करावे, अशीही अपेक्षा राज्यपालांनी या वेळी व्यक्त केली. समुद्रात होणारी तेलगळती व त्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी टाळण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती, भारतीय जहाज महामंडळाच्या महासंचालिका डॉ. मालिनी शंकर यांनी दिली, तर समुद्री चाचेगिरीच्या घटनांमध्ये गेल्या दोन वर्षांत लक्षणीय घट झाल्याची माहिती, अतिरिक्त महासंचालक अमिताभ कुमार यांनी दिली. (प्रतिनिधी)