‘राज्यपाल हटाव’च्या चर्चेने विचित्र अनिश्चितता
By Admin | Updated: June 18, 2014 04:27 IST2014-06-18T04:27:00+5:302014-06-18T04:27:00+5:30
उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी.एल. जोशी यांनी राजीनामा दिल्याची खुद्द केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पुष्टी केली.
‘राज्यपाल हटाव’च्या चर्चेने विचित्र अनिश्चितता
हरीष गुप्ता, नवी दिल्ली
आधीच्या संपुआ सरकारने नेमलेल्या किमान सात राज्यांच्या राज्यपालांना पदे सोडण्याचे निरोप केंद्र सरकारकडून धाडण्यात आल्याचे वृत्त दिवसभर राजकीय वर्तुळात जोरात असतानाच उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी.एल. जोशी यांनी मंगळवारी राजीनामा दिला. मात्र इतर राज्यपालांपैकी किमान तिघांनी राजीनाम्याचा इन्कार केल्याने, दोघांनी राष्ट्रपतींची तर एकाने पंतप्रधानांची भेट घेतल्याने आणि विशेष म्हणजे या सर्व घडामोडींवर मोदी सरकाकडून कोणतेही अधिकृत भाष्य न करण्यात आल्याने दिवअखेर एक अनिश्चितता कायम राहिली.
उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी.एल. जोशी यांनी राजीनामा दिल्याची खुद्द केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पुष्टी केली. मात्र इतर राज्यपालांनाही राजीनामे द्यायला सांगितले आहे का यावर ते काहीच बोलले नाहीत. पण ‘मी त्यांच्या जागी असतो तर यापूर्वीच राजीनामा दिला असता,’ असे सूचक भाष्यही त्यांनी केले. ए.के. नारायणन् (प. बंगाल), शीला दीक्षित (केरळ), मार्गारेट अल्वा (राजस्थान), कमला बेनिवाल (गुजरात), के. शंकरनारायणन् (महाराष्ट्र) आणि देवेंद्र कोनवार (त्रिपुरा) या आधीच्या सरकारने नेमलेल्या राज्यपालांना केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी यांनी फोन करून राजीनामे देण्याचे संकेत दिल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिले. त्यामुळे मोदी सरकारने राज्यपालांना बदलण्याचा घाट घातला आहे, असे तर्कही लढविले गेले.