पुरेशा संख्येअभावी पोलिसांवर ताण
By Admin | Updated: May 28, 2014 00:32 IST2014-05-28T00:32:43+5:302014-05-28T00:32:43+5:30
वेगाने होणारे नागरिकीकरण, रस्त्यावर वाढलेली वाहतूक यात सर्वत्र वाढ होत असली तरी येथील पोलिसांची संख्या मात्र १९५२ साली मंजूर झालेलीच आहे

पुरेशा संख्येअभावी पोलिसांवर ताण
सासवड : सासवड हे पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. शहराची वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे नागरिकीकरण, रस्त्यावर वाढलेली वाहतूक यात सर्वत्र वाढ होत असली तरी येथील पोलिसांची संख्या मात्र १९५२ साली मंजूर झालेलीच आहे. त्यामुळे पोलिसांवर अकारण ताण येत आहे. सासवड पोलिस स्टेशनला स्वत:ची इमारत नाही. एसटी च्या जुन्या जागेमध्ये तात्पुरती डागडुजी करून पोलीस स्टेशन शहरात आणले आहे. परंतु येथे पुरेशा सोयी नाहीत. नवीन इमारत आवश्यक आहे; रस्ता रुंदीकरणाच्या कामात या कार्यालयाची बरीच जागा जाणार आह.े पोलिस स्टेशन जरी शहरात असले तरी कारागृह मात्र गावाच्या दुस-या टोकाला असणा-या तहसील कार्यालयाच्या इमारतीत आहे. या शिवाय तालुक्यात नारायणपूर, बालाजी, पुरंदर किल्ला, सासवड, जेजुरी या ठिकाणी जाणा-या भाविकांची गर्दी वाढली आहे. वीर येथे १० दिवस यात्रा चालते. त्या वेळीही बंदोबस्त ठेवावा लागतो. वेळोवेळी मागणी करूनही कर्मचारी संख्या वाढलेली नाही. याचा परिणाम गुन्हे शोधण्यावर होतो. पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी नोंदविण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. काही वर्षांपूर्वी तक्रार नोंदणी न होता तडजोड करा व मिटवा असा प्रकार चालत असे सासवड व परिसरात घरफोडी, मोटार सायकल चोरी, मोबाईल चोरी असे प्रकार वाढले आहेत. परंतु, या गुन्ह्यांचा तपासच लागत नाही. पुरंदरमध्ये राजकीय हस्तक्षेपालाही सामोरे जावे लागते. दोन तीन वर्षापूर्वी येथील अधिकारी काही प्रकरणात सापडले व निलंबित झाले. अर्थात, ही प्रकरणे सासवड येथे झालेली नव्हती. पण येथे आल्यावर कारवाई झाल्याने अधिकारी टिकतच नव्हते. आता अधिकारी आहेत. परंतु, कर्मचारी कमी आहेत. वाहतूक वाढल्याने तेथेही कर्मचारी अडकले जातात. त्यातच दोन वर्षात बदली होणार असल्याचे कळल्याने कर्मच-यात नाराजी आहे. सासवड पोलीस स्टेशन हदीत ४८ ग्रामपंचायती आहेत व १ नगरपालिका आहे. या सर्व ठिकाणी बंदोबस्त करण्यास कर्मचारी अपुरे पडतात. या शिवाय उस दर आंदोलन, टोल नका आंदोलन होते त्या ठिकाणी या कर्मच-यांना जावे लागते. काही वेळा या पोलिस स्टेशनमध्ये एक किंवा दोन कर्मचारी असतात. एखादी घटना घडल्यावर पोलिसांनी तत्काळ दाखल घ्यावी असे नागरिकांना वाटते. परंतु ते शक्य होत नाही. अवैध दारू धंद्यांवर फार कमी प्रमाणात कारवाई होते. एकंदरीतच या पोलिस स्टेशनला पुरेसा कर्मचारी वर्ग व अद्ययावत इमारतीची गरज आहे. अनेक अडचणी असूनही पोलीस स्टेशनच्या हद्दीत तंटामुक्तीचे काम गतवर्षी चांगले होते, ही समाधानाची बाब आहे. (वार्ताहर)