‘वादळ’वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 03:46 AM2017-12-10T03:46:31+5:302017-12-10T03:48:20+5:30

केरळ आणि तामिळनाडू राज्याचे अतोनात नुकसान करणाºया ओखी चक्रीवादळाचा अप्रत्यक्षरीत्या मुंबईला फटका बसला. हे चक्रीवादळ मुंबईत प्रत्यक्षात धडकले नसले तरी चक्रीवादळाचा विपरीत परिणाम म्हणून मुंबईवर धुरके जमा झाले.

 'Storm' | ‘वादळ’वाट

‘वादळ’वाट

Next

केरळ आणि तामिळनाडू राज्याचे अतोनात नुकसान करणाºया ओखी चक्रीवादळाचा अप्रत्यक्षरीत्या मुंबईला फटका बसला. हे चक्रीवादळ मुंबईत प्रत्यक्षात धडकले नसले तरी चक्रीवादळाचा विपरीत परिणाम म्हणून मुंबईवर धुरके जमा झाले. त्यात ढगाळ वातावरणाने भर घातली आणि अवकाळी पावसाने मुंबईकरांना गारद केले. असाच काहीसा फटका देत दक्षिण गुजरातच्या दिशेने पुढे सरकलेल्या वादळाचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले. कालांतराने हे चक्रीवादळ विरले असले तरी मागील काही वर्षांमध्ये तापमानात झालेल्या वाढीचा परिणाम म्हणून चक्रीवादळाचे प्रमाण वाढले आहे. महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणतज्ज्ञांनीही यास दुजोरा दिला. वेळीच जागतिक तापमानवाढ रोखण्याकडे लक्ष दिले नाही तर भविष्यात चक्रीवादळासह नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढणार असून, याचा अधिकाधिक फटका मनुष्याला बसणार आहे.

मुंबई महापालिका असो अन्यथा उर्वरित कोणतीही यंत्रणा.
अशा वेळी आपत्कालीन व्यवस्थापन चोखरीत्या बजाविणे आवश्यक असते. मात्र नेमके आवश्यक वेळी प्रशासन तोंडघशी पडते आणि नैसर्गिक आपत्तींचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

1मुंबईला धडकणारे चक्रीवादळ हे काही नवे नाही. यापूर्वी अनेक वादळे मुंबईला लागून गेली आहेत. अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षरीत्या या वादळांचा मुंबईला वाईट फटका बसला नसला तरी वेळीच आपण धोक्याची घंटा ओळखणे आवश्यक आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ओखी चक्रीवादळाचा केरळ आणि तामिळनाडूसह गोवा आणि महाराष्ट्राच्या किनाºयांना फटका बसला. विशेषत: केरळ, तामिळनाडू आणि गोव्याच्या तुलनेत महाराष्ट्राच्या किनाºयांना बसलेला फटका कमी होता. तरीदेखील अगदी शेवटच्या क्षणी ताशी २१ किलोमीटर या वेगाने दक्षिण गुजरातकडे पुढे सरकरणाºया ओखीचा परिणाम म्हणून मुंबईत पाऊस पडला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी दादर येथील चैत्यभूमीवर दाखल झालेल्या अनुयायांना याचा वाईट फटका बसला.
2मुळातच ओखी चक्रीवादळाचा इशारा हवामान खाते सातत्याने देत होते. अशा वेळी मुंबई महापालिकेने दादर येथील शिवाजी पार्कवर दाखल झालेल्या अनुयायांच्या निवाºयाची व्यवस्था यापूर्वीच लगतच्या शाळांमध्ये करणे गरजेचे होते. प्रत्यक्षात मात्र तहान लागल्यावर विहीर खोदणाºया महापालिकेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आणि अनुयायांना त्रासाला सामोरे जावे लागले. हा एकच मुद्दा नाही तर ओखीने येथील रस्त्यांचीही दुरवस्था केली. नैसर्गिक आपत्तीची पूर्वकल्पना दिल्यानंतरही प्रशासन कसे गाफील राहते, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे.

नासाचा अहवाल
अमेरिकेच्या नासा या वैज्ञानिक संस्थेच्या एका शाखेने महासागराच्या पाण्याची पातळी वाढल्याने कोणती शहरे किती बुडणार याबाबत एक अहवाल दिला. यात मुंबई शहराबाबत महासागराच्या पातळीत सुमारे १५ सेंमीची वाढ (अर्धा फूट) या शतकाच्या अखेरीस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
तापमानवाढ
आतापर्यंत, १७५० सालाच्या तुलनेत १.२ अंश सेल्सिअसची वाढ पृथ्वीच्या सरासरी तापमानात झाली आहे. सध्या गेली दोन वर्षे ०.२ अंश सेल्सिअस सरासरी प्रतिवर्ष या गतीने वाढ होत आहे. जागतिक हवामान संघटनेचे प्रमुख डॉ. पेट्टेरी टलास हे वाढत्या तापमानाबाबत म्हणतात की, पाच वर्षांत १ अंश सेल्सिअस या गतीने सरासरी तापमानात वाढ होत आहे.

हिमावरण नष्ट
उत्तर ध्रुवप्रदेश, हिमालयासह सर्व पर्वतांवरील बर्फ, पूर्ण पृथ्वीवरील हिमावरण नष्ट होत आहे. सागराची पातळी वाढत असून, शहरे वाचवण्याची भाषा होत आहे. प्रत्यक्षात मात्र या शहरांमुळे पृथ्वीवर ही आपत्ती ओढवली आहे.
कार्बन उत्सर्जन बंद करा
दरवर्षी होत असलेल्या १ हजार कोटी टन कार्बन उत्सर्जनापैकी ४५० कोटी टन उत्सर्जन वाहनांमुळे होत आहे. परिणामी कार्बनचे उत्सर्जन बंद करण्याची गरज आहे. जंगल, नद्या, सागरांतील हरितद्रव्य वाढीस लागण्यासाठी त्यावरील मानवी दबाव काढावा लागेल. औद्योगिकीकरण आणि शहरीकरण थांबवण्याची गरज आहे.

२९३ शहरांवर संकट
वाढत्या पाण्याच्या पातळीचा धोका जपानमधील टोकियोला असेल. भारतामध्ये सर्वाधिक धोका मंगळुरूला असेल. आंध्र प्रदेशातील काकिनाडाजवळच्या बंगालच्या उपसागराची पातळीही वाढेल. ‘ग्रॅडिएंट फिंगरप्रिंट मॅपिंग’च्या मदतीने नासाने समुद्र पातळीत होत असलेल्या वाढीची आकडेवारी गोळा केली आहे. समुद्रकिनारी वसलेल्या जगभरातील २९३ शहरांना भविष्यात संकटाला सामोरे जावे लागेल.

मुंबईला धोका
जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राची पातळी वाढल्याने मुंबईला धोका आहे, असे ‘नासा’ने म्हटले आहे. येत्या १०० वर्षांमध्ये मुंबईजवळील अरबी समुद्रातील पाण्याची पातळी १५.२६ सेंटिमीटरने वाढेल, असा धोक्याचा इशारा ‘नासा’ने दिला आहे.

असे तयार होते वादळ
मुळातच वादळ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. तापमान जास्त असलेल्या ठिकाणी हवा तापून ती वातावरणाच्या वरच्या भागात जाते. आणि याचवेळी खाली म्हणजे जमिनीवर अथवा पाण्यावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते. यात क्षेत्राची तीव्रता वाढली की वादळ तयार होते.
ओखीचा अर्थ ‘डोळा’
बांगलादेशने या चक्रीवादळाचे नामकरण ‘ओखी’ (डोळा) असे केले. याच ओखीचा केरळ, तामिळनाडूसह गोवा आणि महाराष्ट्र म्हणजेच मुंबईलाही फटका बसला. तत्पूर्वी २००९ साली उठलेल्या ‘फियान’ या चक्रीवादळाचा मुंबईला अप्रत्यक्षरीत्या फटका बसला होता.

वादळाचा धोका मुंबईला का नाही?
भौगोलिकदृष्ट्या विचार करायचा झाल्यास बंगालच्या उपसागराच्या तुलनेत अरबी समुद्रात फारशी चक्रीवादळे निर्माण होत नाहीत. परिणामी मुंबईला पर्यायाने म्हणजेच महाराष्ट्राला त्याचा धोकाही नसतो आणि ओखीबाबतही तेच झाले. हे चक्रीवादळात अरबी समुद्रात असले तरी मुंबईहून पुढे दक्षिण गुजरातकडे सरकताना त्याचा वेग आणि प्रभाव कमी झाला.

चक्रीवादळाचा हंगाम
हिंदी महासागराच्या परिघात किंवा क्षेत्रात डिसेंबपर्यंत चक्रीवादळाचा हंगाम असतो, असे हवामान खाते सांगते. महत्त्वाचे म्हणजे जमिनीवर किंवा समुद्रात सातत्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असते. मात्र प्रत्येक कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होईल, असे नाही. तापमान, दाब, वा-याचा वेग अशा अनेक घटकांवर हे सर्व ठरत असते.

जीवितहानी कमी करण्यात यश
अमेरिका किंवा आॅस्टेÑलियासारखा विकसित देश असो वा भारतासारखा विकसनशील देश; आजतागायत कोणत्याही देशाला चक्रीवादळाला थेटपणे सामोरे जाता आलेले नाही. मात्र एकविसाव्या शतकात भरारी घेतलेल्या तंत्रज्ञानाच्या जोरावर चक्रीवादळाची सतर्कता देण्यासह याची जीवितहानी कमी करण्याबाबत आता काही प्रमाणात यश येत आहे.

चक्रीवादळांना नावे कशी दिली जातात?
भारताच्या समुद्रालगत निर्माण होत असलेल्या वादळांना नाव देताना भारतीय हवामान खाते हे उपखंडातील आठ देशांसोबत संपर्क ठेवत असते. वादळाचे नाव हे सर्वांच्या संमतीने ठरविले जाते. नॅशनल हरिकेन सेंटर आणि वर्ल्ड मेट्रोलॉजिकल आॅर्गनायझेशन या दोन संस्थांकडून १९५३ पासून वादळांची नावे ठरविली जातात. नॅशनल हरिकेन सेंटरचे कार्यालय अमेरिकेमधील मियामी येथे आहे. आणि वर्ल्ड मेट्रोलॉजिकल आॅर्गनायझेशनचे कार्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे आहे. दरम्यानच्या काळात उत्तर हिंद महासागरात निर्माण होत असलेल्या चक्रीवादळांना कुठलीच नावे दिली जात नव्हती. यावर भारत, पाकिस्तान, बांगलादेश, मालदिव, ओमान, म्यानमार, श्रीलंका, थायलंड या आठ देशांनी याविषयी एक बैठक घेऊन ६४ नावांची यादी तयार केली आणि प्रत्येक देशात येणाºया वादळांसाठी आठ नावे सुचविण्यात आली. वादळांच्या नावांची यादी प्रत्येक देशाच्या वर्णानुक्रमानुसार आहे. चक्रीवादळांना नाव देण्याचे कारण हे की वादळ पुढे सरकताना राष्ट्रा-राष्ट्रात माहितीची देवाणघेवाण होत असते. देवाणघेवाण होत असतेवेळी एकाच वादळाला वेगवेगळ्या नावांनी ओळखले गेले तर गोंधळ निर्माण होऊ शकतो. म्हणून संबंधित भौगोलिक प्रदेशातील देशांकडून सामायिकपणे सांकेतिक नावाचा वापर केला जातो.

उपग्रहाच्या मदतीने आढावा
उपग्रह आणि रडार अशा आधुनिक उपकरणांमुळे चक्रीवादळांवर कायम नजर ठेवणे शक्य झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे महासंगणकावर चालवल्या जाणाºया आधुनिक मॉडेल्समुळे चक्रीवादळांचे पूर्वानुमान सक्षम, विश्वसनीय झाले आहे. समुद्रात उठलेले कोणतेही चक्रीवादळ किनाºयापासून ५०० किलोमीटर अंतरावर आले की; ते जमिनीवरील रडारच्या कक्षात येते. आणि मग अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने म्हणजे उपग्रहाच्या मदतीने चक्रीवादळाचा आढावा घेता येतो.

प्रयोग सुरू पण...
चक्रीवादळ निर्माण होण्यापासून त्याला रोखणे, त्याची तीव्रता कमी करणे किंवा त्याची दिशा बदलणे हे अद्यापही मनुष्याला जमलेले नाही. अमेरिकेत असे प्रयोग सुरू असले तरी त्यांनाही म्हणावे तसे यश आलेले नाही.

कमी दाबाचे क्षेत्र आणि वादळ
हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या ‘किरोगी’ चक्रीवादळातून जे अवशेष राहिले किंवा जी ऊर्जा राहिली त्यातून नोव्हेंबरदरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. याच काळात श्रीलंकेजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव वाढत गेला.  

- सचिन लुंगसे
 

Web Title:  'Storm'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.