राज काय बोलणार, याचीच राज्यभर चर्चा
By Admin | Updated: May 31, 2014 11:40 IST2014-05-31T05:28:41+5:302014-05-31T11:40:58+5:30
पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे निवडणुकांनंतर एकापाठोपाठ एक कार्यक्रम करत महाराष्ट्रासमोर येत आहेत

राज काय बोलणार, याचीच राज्यभर चर्चा
अतुल कुलकर्णी , मुंबई - पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे निवडणुकांनंतर एकापाठोपाठ एक कार्यक्रम करत महाराष्ट्रासमोर येत आहेत. ‘या मला आपल्याशी बोलायचं आहे...’ असे भावनिक आवाहन करीत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मनसैनिकांना आवाहन केले आहे, तर शिवसेनेने लोकसभेत मिळालेल्या यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी येण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. शिवाय, मनसेच्या मतांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात घटली. त्यामुळे काहीशा नाराज मनसैनिकांपुढे आता पुढे काय, असा प्रश्न उभा राहिला होता. राज यांनी निवडणुकीच्या काळात घेतलेल्या भूमिकेवरदेखील टीकाटिप्पणी झाली. भाजपा-शिवसेनेलादेखील अपेक्षित नसणारा विजय महाराष्टÑात मिळाला. काँग्रेस-राष्ट्रवादीदेखील या मोदी लाटेत भूईसपाट झाले. आम आदमी पक्षालादेखील राज्यात टिकाव धरता आला नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती एकदम जोषात आलेली असताना मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, अशी भूमिका घेत कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला होता. त्यानंतर, स्वत: उद्धव ठाकरे यांनीदेखील शिवसैनिकांना आपण मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत असल्याचे जाहीर करून राज यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीची धार कमी करण्याचा प्रयत्न केला होता. राज्यात भाजपा-शिवसेनेची अवस्था फार चांगली होती, असे चित्र कधीच नव्हते. शिवसेनेपेक्षा भाजपाची अवस्था अत्यंत बिकट होती. मात्र, नरेंद्र मोदी नावाच्या टॉनिकने भाजपाचे नेते अवघ्या काही दिवसांत ताजेतवाने तर झालेच आणि आता स्वबळावरची भाषा करू लागले. निवडणुकीच्या निकालानंतर आजपर्यंत राज एकही शब्द माध्यमांशी बोलले नाहीत की, कुठे बाहेरही फारसे दिसले नाहीत. मात्र, त्यांच्या भेटीगाठी आणि चर्चा पडद्याआड चालूच होत्या. आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत राज ठाकरे उद्या काय भाषण करणार, याचीच उत्सुकता माध्यमांमध्येदेखील आहे. उद्या सोमय्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने सगळ्याच पक्षांनी आता कंबर कसल्याचे आणि कुरघोडीचे राजकारण करण्याचे मनसुबे आखल्याचे स्पष्ट होत आहे.