मुंबई:महावितरण कंपनी सौर उर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मितीला चालना देत आहे. देशात सर्वप्रथम सौर उर्जेद्वारे ४२ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक सौर ऊर्जा क्षेत्रात होत आहे. जवळपास सात हजार मेगावॅट वीजनिर्मिती सौर ऊर्जेवर होणार आहे. जिल्ह्यातील ३० टक्के कृषी वाहिनीचे सौर ऊर्जीकरण डिसेंबर २०२६ पर्यंत करण्याचे मिशन आहे, असे महावितरणचे संचालक राजेंद्र पवार म्हणाले.
महावितरणच्या भांडुप परिमंडळातील पेण मंडळ कार्यालयाचा वर्धापन दिन अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत साजरा झाला. या वेळी विशेष अतिथी म्हणून पवार बोलत होते. ते म्हणाले, ‘अन्न, वस्त्र व निवाऱ्याप्रमाणे वीज आता आपली मूलभूत गरज बनली आहे. शहरी, ग्रामीण किंवा कितीही दुर्गम भाग असो, प्रत्येक नागरिकांचे जीवनमान उंचावण्यात महावितरणचे मोठे योगदान आहे. २० वर्षांच्या कालावधीत महावितरणच्या यंत्रणेचे सक्षमीकरण केले आहे.
दरम्यान, ९ जूनला किल्ले रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रम पार पडला. त्यात महावितरणच्या गोरेगाव विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अखंडित व अपघातरहित वीजपुरवठा केला. त्याबद्दल गोरेगाव विभागाचे कार्यकारी अभियंता आर. जे. पाटील व त्यांच्या टीमला सन्मानित करण्यात आले.
‘आंतरराष्ट्रीय स्तरावर आता काम’ - भांडुप परिमंडळातील मुख्य अभियंता संजय पाटील म्हणाले, महावितरणपुढे पूर्वी भारनियमन, वीज उपलब्धता, यासारखी आव्हाने होती, पण आता आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहोत. - आपल्याला एक मोठी वीजपुरवठा करणारी कंपनी बनण्यापेक्षा लोकांमधली आवडती कंपनी बनून, एक ब्रॅण्ड निर्माण करायचा आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे आपले काम खूप महत्त्वाचे आहे. - राज्याच्या विकासासाठी उद्योगांना दर्जेदार सेवा देणे गरजेचे आहे. त्यासाठी, प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जेची सेवा देण्याची व सुरक्षा साधनांचा वापर करून काम करण्याचा संकल्प घेतला पाहिजे.