‘दोन आठवड्यांत पर्जन्यमापक यंत्रे बसवा’
By Admin | Updated: July 20, 2016 05:58 IST2016-07-20T05:58:00+5:302016-07-20T05:58:00+5:30
मुंबई व उपनगरांत पावसाची नोंद घेणारी ३० स्वयंचलित यंत्रे बसवण्याचा निर्णय मुंबई प्रादेशिक हवामान खाते (आयएमडी- मुंबई) आणि एमएमआरडीएने घेतला

‘दोन आठवड्यांत पर्जन्यमापक यंत्रे बसवा’
मुंबई : मुंबई व उपनगरांत पावसाची नोंद घेणारी ३० स्वयंचलित यंत्रे बसवण्याचा निर्णय मुंबई प्रादेशिक हवामान खाते (आयएमडी- मुंबई) आणि एमएमआरडीएने घेतला होता. त्यासाठी ३० मार्च २०१६ अंतिम मुदत ठरवण्यात आली होती. मात्र, अद्याप आठच यंत्रे बसवण्यात आली आहेत. त्यामुळे उर्वरित यंत्रे येत्या दोन आठवड्यांत बसवा, असा आदेश उच्च न्यायालयाने आयएमडी मुंबई आणि एमएआरडीएला दिला आहे, तसेच २६ जुलै २००५ च्या जलप्रलयानंतर मिठी नदीला पुन्हा पूर येऊ नये, यासाठी काय उपाययोजना आखल्या आहेत. या संदर्भातील प्रतिज्ञापत्र येत्या दोन आठवड्यांत पालिकेला सादर करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.
गेल्या वर्षी १९ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे पूर्ण दिवस मुंबई ठप्प झाली होती. त्यामुळे मुंबईचे आर्थिक नुकसान झाले व लोकांचेही हाल झाले. हवामान खात्याने जोरदार पावसाची पूर्वकल्पना दिली असती, तर नागरिकांचे हाल झाले नसते. त्यामुळे हवामानाचे अचूक वेध घेण्याचे निर्देश मुंबई आयएमडीला द्यावेत, तसेच पावसाची नोंद घेणारी अधिक स्वयंचलित यंत्रे बसवण्यात यावीत, अशी मागणी करणारी जनहित याचिका व्यवसायाने वकील असलेले अटल दुबे यांनी उच्च न्यायालयात केली आहे. त्यावरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती.
मंगळवारी आयएमडी मुंबईने उच्च न्यायालयाला सांगितले की, उपनगरांत डॉप्लर बसवण्यासाठी काही जागा शोधण्यात आल्या आहेत. दिल्ली मुख्यालयापुढे प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर खंडपीठाने या प्रस्तावावर चार आठवड्यांत निर्णय घेण्याचे निर्देश आयमडीच्या दिल्ली मुख्यालयाला दिले आहेत.
मुंबईत २६ जुलै २००५ रोजी आलेल्या महाप्रलयानंतर याविषयी अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चितळे समितीने अहवालात नमूद केलेल्या शिफारशींवर किती अंमलबजावणी केलीत? अशी विचारणा करत, उच्च न्यायालयाने महापालिकेला याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)