मीरा रोड : एसटी महामंडळ ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक बस सुरू करणार असून त्यासाठी ग्रामीण भागात चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. कोस्टल मार्ग हा वाढवण बंदरापर्यंत विस्तारित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्री झाल्यावर मीरा-भाईंदरमध्ये झालेल्या पहिल्याच कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात ‘चाय पे चर्चा’ या उपक्रमाद्वारे मीरा रोड भागातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासह सिमेंट रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करावीत, पाणीपुरवठ्यात वाढ करावी, सीसीटीव्ही कॅमेरे वाढवावेत, दहिसर टोल नाका येथील कोंडी दूर करावी, अनधिकृत रिक्षाचालकांवर कारवाई व्हावी, भाईंदरमधून सुटणाऱ्या एसटी बसची संख्या वाढवावी, आदी मुद्दे उपस्थित केले.
टोल नाका हटवून केवळ अवजड वाहनांसाठी दोन टोल मार्गिका ठेवण्यात येतील. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी शहराच्या विकासकामांसाठी सुमारे ३ हजार कोटींचा निधी मंजूर केला. पाणीपुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मेट्रो व रस्त्यांची कामे लवकर पूर्ण केली जातील, जेणेकरून वाहतूककोंडी सुटेल, असेही ते म्हणाले.
इंधन बचत व प्रदूषण नियंत्रण!
राज्य परिवहन महामंडळाकडून ग्रामीण भागातसुद्धा इलेक्ट्रिक बस चालवल्या जाणार असून यामुळे इंधन खर्चात व देखभाल-दुरुस्तीमध्ये बचत होईल आणि प्रदूषण टळेल.
यासह प्रत्येक एसटी डेपोमध्ये अद्ययावत व स्वच्छ असे स्वच्छतागृह उभारले जाणार आहे. रात्रपाळी करणाऱ्या एसटी चालक, वाहक आदींसाठी झोपण्याची आणि अंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. ही कामे आपण प्राधान्याने हाती घेतल्याचेही त्यांनी सांगितले.