४० लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्या

By Admin | Updated: June 17, 2014 00:43 IST2014-06-17T00:43:58+5:302014-06-17T00:43:58+5:30

मृग नक्षत्र सुरू होऊन आठवडा लोटला तरी पावसाचा पत्ता नाही. पाऊस लांबल्याने पश्चिम विदर्भातील ४० लाख हेक्टरवरील पेरण्याही लांबल्या आहेत.

Sowing of 40 lakh hectare | ४० लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्या

४० लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्या

पश्चिम विदर्भ : पावसाची प्रतीक्षा, कपाशीचा पेरा २० टक्क्यांनी वाढणार
यवतमाळ : मृग नक्षत्र सुरू होऊन आठवडा लोटला तरी पावसाचा पत्ता नाही. पाऊस लांबल्याने पश्चिम विदर्भातील ४० लाख हेक्टरवरील पेरण्याही लांबल्या आहेत.
पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम या पाचही जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. शेतीची मशागत झाली आहे. शेतकऱ्यांनी बियाणे-खताची खरेदीही केली. परंतु पावसाचाच पत्ता नाही. अमरावती विभागात खरिपाचे पेरणी योग्य क्षेत्र ४० लाख हेक्टर एवढे आहे. यातील १६ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनचा पेरा होतो. तर १२ लाख हेक्टरमध्ये कपाशी पेरली जाते. परंतु यावर्षी सोयाबीनचे बियाणे प्रचंड महागले आहे.
त्या तुलनेत बाजारामध्ये सोयाबीनच्या पिकाला तेवढा भाव मिळत नाही. त्यातच महाग असूनही सोयाबीनचे बियाणे सहज उपलब्ध होत नाही. एकट्या अमरावती विभागात एक लाख क्ंिवटल सोयाबीन बियाण्याची कमतरता असल्याने बोगस कंपन्या सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्याकडून कृषी विभागाच्या नाकावर टिच्चून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे.
सोयाबीनची ही स्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांचा कल पुन्हा कपाशीकडे वाढला आहे. कपाशीच्या बियाण्याचे भाव नियंत्रणात आहे, बियाणेही सहज उपलब्ध होत आहे. शिवाय कापसाला बाजारात चांगला भाव मिळतो आहे. किमान हमी भावाची तर खात्री आहे. त्यामुळेच यावर्षी खरीप हंगामात पश्चिम विदर्भात कपाशीचा पेरा २० ते २५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला आहे. यंदा कपाशीचे क्षेत्र १२ लाख हेक्टरवरून १६ लाखांवर जाण्याची दाट शक्यता आहे. अमरावती विभागात केवळ बुलडाणा जिल्ह्यात धुळ पेरणी केली जाते. पाऊस आणखी लांबला तरी धुळ पेरणीवर फार फरक पडत नसल्याचे कृषी खात्यातून सांगण्यात आले. सिंचन व्यवस्थेवर (ड्रीप प्लॅन्टेशन) पश्चिम विदर्भात चार हजार २०० हेक्टरमध्ये कपाशीची लागवड करण्यात आली आहे. परंतु रखरखत्या उन्हाळ्यात या घातलेल्या पाण्यामुळे जमिनीतील ओलावा तेवढा कायम राहत नाही. पर्यायाने वेळीच पाऊस न आल्यास कपाशीचे हे पीक अडचणीत सापडण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी योग्य चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Sowing of 40 lakh hectare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.