दक्षिण आशिया होरपळतोय!

By Admin | Updated: July 5, 2015 02:40 IST2015-07-05T02:40:13+5:302015-07-05T02:40:13+5:30

दक्षिण नैर्ऋत्य मान्सून भारतासाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा. जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळ्याचा. पण त्याचं रूप वर्षानुवर्षे वेगवेगळं असतं. कधी मान्सून जास्त बरसतो तर कधी कमी.

South Asia swirls! | दक्षिण आशिया होरपळतोय!

दक्षिण आशिया होरपळतोय!

- शुभांगी भुते

(लेखिका मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या संचालक आहेत.)

दक्षिण नैर्ऋत्य मान्सून भारतासाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा. जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळ्याचा. पण त्याचं रूप वर्षानुवर्षे वेगवेगळं असतं. कधी मान्सून जास्त बरसतो तर कधी कमी. मान्सूनच्या बदलत्या रूपाला बरेच घटक कारणीभूत ठरतात. जसे की, अलनिनो, युरोपिय देशातील वातावरणातील उष्णता, समुद्राचे तापमान आणि पूर्व आशियायी देशांतील हवेचा दाब. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम विचारात घेऊन भारतीय हवामान शास्त्र विभाग दरवर्षी पावसाची दीर्घकालीन पूर्वअनुमान देते. साधारणत: पावसाळ्याचे आगमन केरळपासून होते. टप्प्याटप्प्याने तो संपूर्ण देश व्यापतो. या साऱ्या काळात वातावरणात कमी-जास्त प्रमाणात फरक पडत असतात.
यंदा भारतात पावसाळ्याचे आगमन ५ जूनला झाले. २६ जूनपर्यंत त्याने संपूर्ण देश व्यापला. पण याच काळात आपल्या शेजारील देशात म्हणजेच पाकिस्तानात उष्णतेची लाट आली; आणि त्यात हजारो लोकांचे प्राण गेले. पावसाळ्याच्या सुरुवातीला एक कमी दाबाचा पट्टा तयार होत असतो. या पट्ट्याची व्याप्ती राजस्थानपासून पाकिस्तानपर्यंत असते. यालाच उष्णता (हिट) असेही म्हणतात. याचवेळी संबंधित ठिकाणापासून बंगालच्या उपसागरापर्यंत द्रोणीय भाग तयार होऊन कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होतो. यालाच ‘हिट लो’ असेही म्हणतात. जेव्हा कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होतो तेव्हा वाऱ्यांची दिशा पश्चिम/दक्षिण अशी असते. हेच वारे समुद्राहून अधिक तीव्रतेने वाहतात. याचाच
परिणाम म्हणून या वर्षी पाकिस्तानात उष्णतेची लाट येऊन गेली आहे. याच काळात जमिनीवर अगदी कमी प्रमाणात वारे वाहतात आणि हे सर्व वारे उष्ण-अतिउष्ण असतात. सोबतच या दिवसांत आर्द्रतेचे प्रमाण प्रचंड वाढते. सामान्य लोकांना ४३ डिग्री अंश सेल्सिअस असलेले तापमान पण ४७ डिग्रीपर्यंत आहे असे जाणवते. आता उद्भवलेली परिस्थिती खूप दिवस सुरू होती आणि हा एक संशोधनाचाच विषय आहे. तसेच आयपीसीसीच्या रिपोर्टमध्येसुद्धा हे नमूद केले आहे
की, आताची उष्णतेची लाट ही जागतिक तापमानवाढीमुळे आली आहे. हे प्रमाण दक्षिण आशियायी देशांमध्ये अधिक आहे. हा एका एक्स्ट्रिम वेदरचा भाग असून, अनेक देश संशोधन करीत आहेत.


अलनिनो, युरोपिय देशातील वातावरणातील उष्णता, समुद्राचे तापमान आणि पूर्व आशियायी देशांतील हवेचा दाब; असे अनेक घटक भारतीय मान्सूनवर प्रभाव पाडत असतात. समुद्राचे वाढते तापमान आणि हवेचा दाब या घटकांमुळे उष्णतेची लाट पसरते. जागतिक तापमानवाढही यात भर घालते. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून मान्सून हेलकावे खातो, उष्णतेच्या लाटेची व्याप्तीही वाढते. हे बदल मात्र आपल्याला सोसत नाहीत.

 

Web Title: South Asia swirls!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.