आणखी काही वर्षे सोसा हालअपेष्टा
By Admin | Updated: August 25, 2014 03:39 IST2014-08-25T03:39:58+5:302014-08-25T03:39:58+5:30
वीर ते करंजाडीदरम्यान रविवारी मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले आणि गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी जाणा-या कोकणवासीयांना मोठ्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागले

आणखी काही वर्षे सोसा हालअपेष्टा
सुशांत मोरे, मुंबई
वीर ते करंजाडीदरम्यान रविवारी मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले आणि गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी जाणा-या कोकणवासीयांना मोठ्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागले. एकच रेल्वेमार्ग असल्याने अशा घटना घडल्यानंतर कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प होणे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे दुहेरी मार्गाची मागणी गेली कित्येक वर्षे होत आहे. मात्र दुहेरी मार्गाचा केवळ सर्व्हे पूर्ण झाला असून, त्याचा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर होणे बाकी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोकणवासीयांना आणखी काही वर्षे अशाच प्रकारच्या हालअपेष्टांना सामोर जावे लागणार आहे.
पावसाळ्यात किंवा ऐन सणासुदीच्या दिवसांत कोकण रेल्वेमार्गावर एखादी दुर्घटना घडल्यास रेल्वेसेवा ठप्प होते. १४ एप्रिल रोजी संगमेश्वर-उक्शीदरम्यान मालगाडीचे चार डबे घसरले. यामुळे कोकण रेल्वे तब्बल २३ तासांनंतर पूर्ववत झाली. तर त्यानंतर ४ मे रोजी दिवा-सावंतवाडी ट्रेनला नागोठणेजवळ मोठा अपघात झाला. त्या वेळीही कोकण रेल्वे १९ तासांनंतर पूर्ववत झाली. करंजाडीजवळ झालेला या मार्गावरील तिसरा अपघात आहे. अपघातानंतर रेल्वेसेवा अंशत: सुरूच ठेवण्यासाठी दुहेरी मार्ग आवश्यक आहे. मात्र दुहेरी मार्ग नसल्याने अपघातानंतर वाहतुकीचा खोळंबा होतो. दरम्यान, मध्य रेल्वेने त्यांच्या मार्गावर दुहेरीकरणाचे काम हाती घेतले असून, पेण ते कासू साधारण चार महिन्यांत तर कासू ते रोहापर्यंत साधारण सहा ते आठ महिन्यांत काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतरचा टप्पा हा कोकण रेल्वेचा असून कोकण रेल्वेकडून कोलाड ते ठोकूर या ७४१ किलोमीटरच्या मार्गावर दुहेरीकरण केले जाणार आहे. हे दुहेरीकरण संपूर्ण न करता टप्प्याटप्यात केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. सध्या या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण केले जाईल आणि त्याचा अहवाल बनवून रेल्वे बोर्डाला सादर केला जाईल. मात्र यासाठी निश्चित कालावधी ठरवला नसल्याने कोकणवासीयांच्या हालअपेष्टा आणखी काही वर्षे सुरूच राहतील, हेच दिसून येते.