व्यसनामुळे सामाजिक सौख्य धोक्यात
By Admin | Updated: July 1, 2016 02:24 IST2016-07-01T02:24:01+5:302016-07-01T02:24:01+5:30
नाइटलाइफचा सर्वसामान्य मुंबईकरांना काहीच फायदा नाही.

व्यसनामुळे सामाजिक सौख्य धोक्यात
मुंबई : नाइटलाइफचा सर्वसामान्य मुंबईकरांना काहीच फायदा नाही. नाइटलाइफ सुरू झाले तर येथील सामाजिक सौख्य धोक्यात येईल. महत्त्वाचे म्हणजे मुंबईमधील व्यसनाच्या प्रमाणाचा विचार करता, आत्ताच पुरुषांमध्ये व्यसनाचे प्रमाण ६० टक्के आहे. महिलांमध्ये व्यसनाचे प्रमाण ३० टक्के आहे. नाइटलाइफ सुरू झाले, तर व्यसनाच्या प्रमाणात वाढ होईल, असे म्हणत महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी नाइटलाइफवर तोफ डागली.
केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘मॉडेल शॉप्स अॅण्ड एस्टॅब्लिशमेंट्स’ कायद्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे देशभरातील विविध शहरांतील मॉल्स, दुकाने रात्रभर सुरू राहणार आहेत. या कायद्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना नाइटलाइफ अनुभवता येईल, असा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र हे साफ चुकीचे आहे, असे म्हणत वर्षा विद्या विलास यांनी सांगितले, नाइटलाइफ नक्की कोणासाठी आहे? याचा विचारच झालेला नाही. सर्वसामान्य मुंबईकर दिवसा कष्ट करून नाइट लाइफ कसा जगेल, हा प्रश्नच आहे. उलटपक्षी येथे नाइटलाइफ सुरू झाले, तर इथल्या पायाभूत सेवा-सुविधांवर ताण येईल. लोकल, बेस्ट बस, रिक्षा आणि टॅक्सी रात्रभर धावणार आहेत का, या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नाही.
१ लाख सीसीटीव्हींची गरज
मुंबईत सुरक्षेसाठी येथे किमान नाइट व्हिजन असलेले १ लाख सीसीटीव्ही लावण्याची गरज आहे, तरच पोलीस नियंत्रण कक्षातून नियंत्रित ठेवू शकतात, अशी प्रतिक्रिया फायर अॅण्ड सिक्युरिटी असोसिएशन आॅफ इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद राव यांनी दिली.
बंदोबस्तासाठी
पोलीस सक्षम
नाइटलाइफ सुरू झाल्यास आवश्यक बंदोबस्त पुरविण्यासाठी पोलीस सक्षम आहेत. जिथे बंदोबस्त लागेल तेथे पोलीस हजर राहतील. सुरक्षेत कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही.
- अशोक दुधे, मुंबई पोलीस प्रवक्ते (पोलीस उपायुक्त)
‘कृष्णकृत्यांना वाव मिळणार’
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर म्हणाल्या, अंधारामध्ये ‘कृष्णकृत्ये’ होतात हे जगजाहीर आहे आणि त्याला वाव देणारा असा हा निर्णय आहे. पंतप्रधान योग किती महत्त्वाचा हे सांगतात, तर मुख्यमंत्र्यांवर संघाचा पगडा आहे. या निर्णयाचा परिणाम शरीर स्वास्थ्यावर, कौटुंबिक स्वास्थ्यावर किती होईल, याचा विचार केलेला दिसत नाही.