...तर जनतेने काय करावे?
By Admin | Updated: June 19, 2016 00:51 IST2016-06-19T00:51:16+5:302016-06-19T00:51:16+5:30
राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की, प्रशासन ऐकत नाही. त्यांचेच प्रशासन ऐकत नसेल, तर जनतेने न्याय कुणाकडे मागायचा, असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला.
...तर जनतेने काय करावे?
खोर (जि. पुणे) : राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की, प्रशासन ऐकत नाही. त्यांचेच प्रशासन ऐकत नसेल, तर जनतेने न्याय कुणाकडे मागायचा, असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. भाजपा सरकार आणि ‘अच्छे दिन’ याची चांगलीच खिल्लीही त्यांनी उडवली.
खोर (ता. दौंड) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन व सव्वा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी ते म्हणाले की, ‘धनगर समाजाच्या अभ्यासाच्या नावाखाली या समाजाला आरक्षण देण्यासाठी हे सरकार चालढकल करीत आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील असून, शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची मदत करायला तयार नाही. एकीकडे सध्या जिल्ह्याला दुष्काळाच्या परिस्थितीशी सामना करावा लागत आहे. राज्यामधील एकाही जिल्ह्यात चारा छावण्या सुरू नाहीत आणि दुसरीकडे सरकार ‘अच्छे दिन’चा नारा देत मिरवत आहे.’ (प्रतिनिधी)