वेगळ्या विदर्भासाठीच भिरकावली होती चप्पल
By Admin | Updated: August 21, 2014 01:08 IST2014-08-21T01:08:06+5:302014-08-21T01:08:06+5:30
विदर्भाच्या मातीत येऊन येथील जनतेच्या भावनांचा अपमान करण्याचा राजकारण्यांना काहीच हक्क नाही. अजित पवार सातत्याने विदर्भवाद्यांच्या लढ्याचा अपमान करीत होते.

वेगळ्या विदर्भासाठीच भिरकावली होती चप्पल
शोभा मस्के यांचे प्रतिपादन : विदर्भाच्या नावाखाली निवडणुकांत उतरण्याची विदर्भवाद्यांची तयारी
नागपूर : विदर्भाच्या मातीत येऊन येथील जनतेच्या भावनांचा अपमान करण्याचा राजकारण्यांना काहीच हक्क नाही. अजित पवार सातत्याने विदर्भवाद्यांच्या लढ्याचा अपमान करीत होते. सहनशीलतेला अंत असतोच. त्यांच्या विदर्भविरोधी भूमिकेसंदर्भात संताप व्यक्त करण्यासाठीच चार्मोशी येथे त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावली, असे मत विदर्भवादी कार्यकर्त्या शोभा मस्के यांनी व्यक्त केले. ‘व्ही कॅन’ (विदर्भ कनेक्ट) या विदर्भवादी संस्थेतर्फे ‘मैने चप्पल क्यो मारा’ या चर्चेचे चिटणवीस केंद्र येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चार्मोशी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिशेने चप्पल भिरकावणाऱ्या शोभा मस्के यांनी आपली भूमिका मांडली.
या चर्चेला ज्येष्ठ विधीज्ञ व विदर्भवादी अॅड. श्रीहरी अणे , ‘व्ही कॅन’चे अध्यक्ष अॅड.मुकेश समर्थ , ‘वेद’चे संस्थापक विलास काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मस्के दाम्पत्याचा विशेष भेट देऊन सत्कार करण्यात आला. अजित पवार यांनी त्यांच्या वक्तव्यातून विदर्भातील जनमताचा अपमान केल्याबद्दल जाब विचारायचा होता. अखेर सहनशीलतेचा बांध सुटला आणि त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावून विदर्भाचा संताप त्यांच्यापर्यंत पोहोचविला, असे शोभा मस्के म्हणाल्या. गेल्या १० वर्षात विदर्भासाठी लढताना २५ ते ३० गुन्हे दाखल झाले आहे. परंतु लढा चालूच राहील. जोपर्यंत विदर्भ देणार नाही तोपर्यंत विदर्भविरोधी नेत्यांना या भूमीत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
वेगळ्या विदर्भासाठी जनतेनेच पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. याची सुरुवात नागपुरातील यशवंत स्टेडियमचे नाव ‘स्व.बापूजी अणे’ स्टेडियम असे करण्यासाठी आंदोलन उभारून करावी असे मत बाबूराव मस्के यांनी व्यक्त केले. शोभा मस्के यांच्यामुळे विदर्भाचे आंदोलन ४४ वर्षानंतर आक्रमक झाले आहे. यानंतर कुठलाही नेता विदर्भाच्या भूमीत येऊन विदर्भविरोधी भूमिका घेण्याअगोदर दहा वेळा विचार करेल, असे मत जेष्ठ विधीज्ञ अॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला ‘व्ही कॅन’चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. विदर्भाच्या आंदोलनासंदर्भात अनेकांनी सूचना मांडल्या. (प्रतिनिधी)
विदर्भवादी निवडणूक लढणार?
वेगळ््या विदर्भाच्या लढ्याला आणखी धार यावी यासाठी विदर्भवाद्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांत उभे राहावे असा सूर या चर्चेत दिसून आला. निवडणूक लढायला काहीच हरकत नाही. विदर्भाचा आवाज बुलंद होत असेल तर हे पण करायला हवे असे मत ‘व्ही कॅन’चे अध्यक्ष अॅड. मुकेश समर्थ यांनी व्यक्त केले. ‘व्ही-कॅन’सोबतच इतर विदर्भवादी सदस्यांनी विदर्भाच्या नावाखाली जर सर्व एकत्र येत असतील तर निवडणूक लढण्याची तयारी यावेळी बोलून दाखविली.
मोदींचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा
पंतप्रधानांचे वेगळ्या विदर्भाच्या मुद्याकडे लक्ष वेधण्यासाठी ‘व्ही कॅन’तर्फे जिल्हा न्यायालय ते संविधान चौकापर्यंत गुरुवारी मोर्चा काढण्यात येणार आहे.