सहा वर्षांच्या एकताची १० तास मृत्यूशी झुंज
By Admin | Updated: July 1, 2016 03:06 IST2016-07-01T03:06:51+5:302016-07-01T03:06:51+5:30
अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरड्या पोरीला तिच्या सावत्र बापानं निर्दयपणे बुधवारी रात्री ८ वाजता उल्हास नदीत मरण्याकरिता फेकून दिले.

सहा वर्षांच्या एकताची १० तास मृत्यूशी झुंज
पंकज पाटील,
बदलापूर- एकता तुळशीराम सैनी या अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरड्या पोरीला तिच्या सावत्र बापानं निर्दयपणे बुधवारी रात्री ८ वाजता उल्हास नदीत मरण्याकरिता फेकून दिले. मात्र, तिचं दैव बलवत्तर असल्यानं ती नदीतील जलपर्णींमध्ये जाऊन अडकली. आभाळातून पावसाच्या सरी कोसळत आहेत... नदीचा प्रवाह खळखळ वाहत आहे... पायाला मासे चावा घेत आहेत... नदीतील साप आजूबाजूने सुळकन फिरत आहेत आणि मिट्ट काळोखात मृत्यू झडप घालण्याकरिता घोटाळतो आहे... अशा वातावरणात त्या चिमुरडीने तब्बल १० तास मृत्यूशी कडवी झुंज दिली. सकाळी काही कामगारांना एकता दिसली आणि मग अग्निशमन दलाच्या मदतीने तिची सुटका झाली.
एकता तिची आई निर्मला तुळशीराम सैनी हिच्यासोबत ठाण्यातील लोकमान्यनगर परिसरात राहते. निर्मला आणि तुळशीराम या दोघांचेही एकमेकांसोबतचेहे दुसरे लग्न आहे. मात्र, लग्नानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाल्याने ते दोघेही वेगळे राहत आहेत. तुळशीराम हा पुण्यात, तर निर्मला ही ठाण्यात राहते. तुळशीराम हा निर्मलाला एकत्र राहण्याकरिता पुण्याला येण्याचा आग्रह करत होता. मात्र, त्याच्या त्रासाला कंटाळल्याने निर्मलास ठाण्यात स्वतंत्र राहायचे होते. एकता ही निर्मलाला तिच्या पहिल्या पतीपासून झालेली मुलगी. निर्मला आणि आपल्या एकत्र नांदण्यामध्ये एकता हिचाच अडसर असल्याचा तुळशीरामचा समज झाला होता. नेमकी हीच बाब एकताच्या जीवावर बेतली.
बुधवारी सायंकाळी तुळशीराम निर्मलाच्या ठाण्यातील घरी आला व एकताला घेऊन गेला. मुलगी घरी नसल्याने निर्मलाने वर्तकनगर पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. त्यामध्ये तुळशीरामवर तिने संशय व्यक्त केला. एकताला घेऊन तुळशीराम बदलापूरच्या दिशेने गेला. बदलापूर येथील वालिवलीच्या उल्हास नदीच्या पुलावर गेल्यावर त्याने तिला उचलून थेट ३० फूट खोल नदीपात्रात फेकले. आता ही पोर बुडून मरणार आणि आपल्या व निर्मलाच्या नात्यामधील अडसर दूर होणार, असा तुळशीदासचा समज झाला.
एकताकरिता काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. नदीत पडलेली एकता खळखळत्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत नदीतील जलपर्णीमध्ये जाऊन अडकली. उल्हास नदीचा जीव घेणाऱ्या जलपर्णीने एकताला मात्र जीवदान दिले. पावसाच्या सरी कोसळत असताना हा जेमतेम सहा वर्षांचा चिमुकला जीव हाताला लागलेली जलपर्णी घट्ट पकडून पाण्यावर तरंगत राहिला, हाच दैवी चमत्कार आहे. अंधाराचे साम्राज्य पसरल्यावर दुथडी भरून वाहणारी उल्हास नदी भल्याभल्यांच्या काळजाचा थरकाप उडवते. अशा या नदीपात्रात ही पोरं टिकाव धरून कशी राहिली, याचेच आता सर्वांना आश्चर्य वाटत आहे.
>तर ही ‘फुलराणी’ आज हयात नसती...
उल्हास नदीच्या पात्रात जेथे एकताला फेकण्यात आले होते, तेथे महिनाभरापूर्वी जलपर्णी आलेली नव्हती. पुलापासून २०० मीटर अंतरापर्यंतच जलपर्णी आली होती. केवळ १५ दिवसांपूर्वीच जलपर्णी आली होती. ही जलपर्णी नसती, तर ही एकता नावाची ‘फुलराणी’ कदाचित हयात नसती.
उल्हास नदीत वेगवेगळ्या जातींचे मासे आणि पाणसाप मोठ्या प्रमाणात आहेत. पाण्यात तरंगत असताना एखाद्या पाणसापाने तिला दंश केला असता तर कदाचित तिची जलपर्णीवरील पकड ढिली पडली असती.
उल्हास नदीतील जलपर्णीमुळे पट्टीचा पोहणाराही पाण्यात उतरत नाही. त्या नदीपात्रात एकताची १० तासांची मृत्यूशी झुंज हे धाडस असल्याने तिच्या चिकाटीचे कौतुक केले जात आहे.
>वडिलांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा
बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ती तशीच पाण्यात राहिली. नदीच्या पात्रालगत सुरू असलेल्या बांधकामावरील मजुरांनी एकताला पाहिले. मात्र, नदीचे रौद्र रूप पाहून त्यांचेही तिला वाचवण्याकरिता नदीत उतरण्याचे धाडस झाले नाही. हळूहळू जमाव जमू लागला व अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. त्यांनी एकताला बाहेर काढले.
मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेली एकता प्रचंड भयभीत झाली होती. आपल्याला वडिलांनी नदीत फेकलं, एवढंच ती सांगू शकली. घरचा पत्ता विचारल्यावर ती केवळ ‘बस स्टॅण्डजवळ राहते’,असे सांगत होती. अखेरीस ती ठाण्यातील लोकमान्यनगर येथील बस डेपोजवळ राहते, याचा उलगडा झाला.
वर्तकनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यावर एका मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले. आई-मुलीची गळाभेट झाली, तेव्हा एकता रडतरडत बाबांनी मला नदीत फेकलं, असं सांगत होती. पोलिसांनी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला.