सराफा व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या सहा जणांवर मोक्का
By Admin | Updated: August 22, 2016 02:42 IST2016-08-22T02:42:31+5:302016-08-22T02:42:31+5:30
सराफ व्यावसायिकाचे अपहरण करून लाखोची खंडणी मागणाऱ्या सहा जणांच्या टोळीला खारघर पोलिसांनी मोक्का कायद्याअंतर्गत अटक केली

सराफा व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या सहा जणांवर मोक्का
पनवेल : सराफ व्यावसायिकाचे अपहरण करून लाखोची खंडणी मागणाऱ्या सहा जणांच्या टोळीला खारघर पोलिसांनी मोक्का कायद्याअंतर्गत अटक केली आहे. या सर्वांना अलिबाग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे सर्व आरोपी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील आहेत.
सांगलीतील एका व्यक्तीचा अहमदाबाद येथे सराफाचा व्यवसाय होता. मार्च महिन्यात ते खारघरमध्ये व्यवसायानिमित्त आले असता त्यांची ओळख खारघरमधील एका ज्वेलर्सबरोबर झाली. ते दोघेही रात्री एका लग्नाच्या कार्यक्र मासाठी जात असताना, मोटारकारमधून आलेल्या आठ ते नऊ व्यक्तीच्या टोळीने या दोघांचे अपहरण करून अकरा लाखांची मागणी केली. पोलीस मागावर असल्याची माहिती मिळताच या टोळीने या दोघांना इंदापूर येथे सोडून पळ काढला. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांच्या पथकाने या टोळीतील सुभाष नामदेव माने, नितीन बापू कदम, तेजस दादासाहेब पाटील, अरविंद प्रताप पवार, अमोल शिवाजी माने, संदीप राजाराम भोसले यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता या टोळीने सोलापूर, पुणे व इतर भागातून काहींचे अपहरण करून खंडणी मागितल्याचे प्रकार उघडकीस आल्याने या सहा व्यक्तींच्या विरोधात संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत अटक केली आहे. (प्रतिनिधी)
>खंडणीचे गुन्हे उघड
सुभाष नामदेव माने, नितीन बापू कदम, तेजस दादासाहेब पाटील, अरविंद प्रताप पवार,अमोल शिवाजी माने, संदीप राजाराम भोसले यांना ताब्यात घेवून चौकशी
या टोळीने सोलापूर, पुणे व इतर भागातून काहींचे अपहरण करून खंडणी मागितल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी शिताफीने तपास करून या टोळीचा पर्दाफाश केला. त्यांना जेरबंद केले. न्यायालयाने त्यांना २६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.