बसस्थानकाला समस्यांचा वेढा
By Admin | Updated: May 21, 2016 01:31 IST2016-05-21T01:31:30+5:302016-05-21T01:31:30+5:30
एसटी स्थानक खड्ड्यांनी भरले असून, अतिक्रमणांनी घेरले आहे. ते बेकायदा पार्किंगचे हक्काचे ठिकाण झाले आहे.

बसस्थानकाला समस्यांचा वेढा
राजगुरुनगर : एसटी स्थानक खड्ड्यांनी भरले असून, अतिक्रमणांनी घेरले आहे. ते बेकायदा पार्किंगचे हक्काचे ठिकाण झाले आहे. संरक्षक भिंत नसल्याने हे स्थानक म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी त्याची अवस्था झाली आहे.
राजगुरुनगरला प्रशस्त एसटी स्थानक आणि आगार आहे. सुमारे अडीच एकर जागेवर ते वसले आहे. पण सध्या त्याची दुरवस्था झाली असून, डांबर ठिकठिकाणी उखडले आहे. त्यामुळे सर्वत्र चढ-उतार तयार झाले आहेत. एसटी राजगुरुनगर स्थानकात आली की आपटायला आणि हिंदकळायला सुरुवात होते. राजगुरुनगर आले हे समजण्यासाठी ही व्यवस्था केल्याचा विनोद त्यामुळे येथे प्रचलित आहे.
अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. ते बुजवण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. थोडीफार डागडुजी केली जाते, पण ते पुन्हा उखडतात. स्थानकात असलेल्या स्वच्छतागृह आणि सर्विसिंग सेंटरचे पाणी जाण्याची व्यवस्था दोषपूर्ण असल्याने काही ठिकाणी पाणी साचून ते पुणे-नाशिक महामार्गापर्यंत जाते. तसेच त्यामळे खड्डे तयार होतात. म्हणून त्या पाईपलाईनचे नूतनीकरण आवश्यक आहे.
जास्त उत्पन्नासाठी एसटीने अनेक स्टोल्स दिले आहेत. पण त्यांचे नियोजन नसल्याने ते एका रांगेत दिलेले नाहीत. या स्टोल्सवर बाहेरच्या ग्राहकांची गर्दी होत असल्याने एसटी येण्याजाण्यास तसेच प्रवाशांना त्रास होतो. अनेक ग्राहक या स्टॉल्सबाहेर दुचाकी लावून उभे असतात.
सुलभ शौचालय मध्यभागी बांधून ठेवले असल्याने एसटी येण्याजाण्यास कमी जागा शिल्लक राहते.
हे स्टोल्स, शौचालय, ‘पे आणि पार्क’साठी जागा, अनावश्यक चौथरा, जाहिरातीचे फलक, बेकायदा पार्किंग केलेल्या गाड्या यामुळे स्थानकाची मोठी जागा असूनही येथे खूप गर्दी झाली आहे. त्यामुळे अस्वच्छता वाढली आहे. सगळीकडे कचरा आणि प्लॅस्टिक कचरा पाहावयास मिळतो. या सर्व गर्दीत एसटी गाड्यांना कमी जागा शिल्लक राहते. त्यामुळे प्रवासी आणि चालकांची तारांबळ उडते.
आगाराच्या दुरुस्तीसाठी ८० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यातून कंपाउंड, इमारतीची डागडुजी, पाणीपुरवठा, विश्रांतीगृह, आसने आणि डांबरीकरण इत्यादी कामे करण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केले होते. पण कामाबाबत अद्यापही प्रगती झालेली नाही.