शिवसेनेचे ठाणे
By Admin | Updated: June 19, 2015 04:44 IST2015-06-19T04:44:34+5:302015-06-19T04:44:34+5:30
१९ जून १९६६. महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण देणारी ही तारीख. प्रत्येक शिवसैनिकासाठी त्याच्या जन्मतारखेइतकीच महत्त्वाची असलेली ही तारीख.

शिवसेनेचे ठाणे
- एकनाथ शिंदे
१९ जून १९६६. महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण देणारी ही तारीख.
प्रत्येक शिवसैनिकासाठी त्याच्या जन्मतारखेइतकीच महत्त्वाची असलेली ही तारीख.
नव्याने पेटून उठलेल्या मराठी अस्मितेच्या हुंकाराची द्वाही अवघ्या आसमंतात फिरवणारी ही तारीख. १०६ हुतात्म्यांचं रक्त सांडून मिळवलेल्या मुंबईत, महाराष्ट्राच्या या राजधानीतच मराठी माणसाची होत असलेली गळचेपी पाहून दादरच्या एका व्यंगचित्रकार तरुणाचं रक्त सळसळलं, मन पेटून उठलं. मराठी माणसाची ही त्याच्याच घरात होणारी गळचेपी दूर करण्यासाठी काहीतरी करण्याच्या विचाराने तो झपाटून उठला आणि त्यातूनच जन्माला आला शिवसेना नावाचा झंझावात!!
या झंझावातात भलेथोरले वृक्ष उन्मळून पडले, प्रस्थापित पाचोळ्यासारखे उडून गेले, महाराष्ट्रातल्या पारंपरिक राजकारणाची शैली बदलून गेली. नव्या, आक्रमक आणि मुख्य म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड राजकारणाची शैली शिवसेनेने आपल्या जन्मापासूनच रूढ केली.
महाराष्ट्रातला तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर शिवसेनेकडे आकर्षित होण्याचं ते एक प्रमुख कारण होतं. जागच्या जागी मिळणारा न्याय! वस्तीत पाण्याचा नळ बसवणं असो, नोकरीच्या ठिकाणी डावललं जाणं असो किंवा शाळेची अॅडमिशन असो, दैनंदिन आयुष्यातील या समस्यांनी सामान्य मराठी माणूस मेटाकुटीला आला होता. तेव्हाचे सत्ताधीश स्वत:च्याच मस्तीत सामान्य जनतेला विसरून गेले होते. त्यामुळेच शिवसेनेच्या शाखाशाखांवर सामान्य जनता गर्दी करू लागली आणि इथे चुटकीसरशी समस्या सुटतात, हे लक्षात आल्यानंतर या गर्दीत भरच पडू लागली.
शिवसेनेने नेहमीच तरुणांना विधायक कार्यक्रम दिला आहे. मराठी तरुणांमधील उद्यमशीलता वाढीस लागावी, असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सुरुवातीपासून आग्रह होता. शिवसेनेने मराठी तरुणांना केवळ वडापाव दिला, असं म्हणून हिणवणारे बरेच आहेत. पण वडापाव हे केवळ प्रतीक आहे. मराठी तरुणांनी नोकरीची बंधनं झुगारून उद्योगांमध्ये उतरावं, त्यासाठी वाट्टेल तितकी मेहनत करावी, हे त्यामागील खरं मर्म होतं. त्याचवेळी प्रत्येकाला उद्योग करणं शक्य नाही, हे जाणून चाकरमान्यांचे हित जपण्यासाठी, त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी आणि मुंबई आणि महाराष्ट्रातल्या नोकरीत स्थानिक मराठी जनतेला हक्काचे स्थान मिळालेच पाहिजे, यासाठी ‘स्थानीय लोकाधिकार समिती’च्या माध्यमातून शिवसेनेनं इथल्या मराठी जनतेला न्याय मिळवून दिला.
‘स्थानीय लोकाधिकार समिती’ असो वा सध्या कामगारांच्या प्रश्नांसाठी झुंजणारी ‘भारतीय कामगार सेना’, शिवसेनेनं नेहमीच सामान्य मराठी माणसाच्या हितासाठी कडवट भूमिका घेतली आहे.
‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून दिलेला मंत्र आजही शिवसैनिक प्राणपणाने जपतात. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही हाच वारसा पुढे चालू ठेवला आहे. हाच मंत्र घेऊन शिवसेना वाऱ्याच्या वेगाने महाराष्ट्रात पसरली. त्यातला ‘ठाणे’ हा शिवसेनेच्या वाटचालीतला महत्त्वाचा टप्पा. शिवसेनेला सत्तेचा पहिला मान ठाण्यानेच दिला.
(लेखक सार्वजनिक बांधकाम मंत्री (सा. उ.) आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत)