शिवसेनेचा सिडकोवर हंडा मोर्चा

By Admin | Updated: June 30, 2016 02:45 IST2016-06-30T02:45:47+5:302016-06-30T02:45:47+5:30

जलवाहिन्या जीर्ण झाल्याने कळंबोली वसाहतीतील एलआयजीमध्ये दूषित पाणी येत असल्याच्या तक्र ारी येत आहेत.

Shivsena's Cidcoor Honda Morcha | शिवसेनेचा सिडकोवर हंडा मोर्चा

शिवसेनेचा सिडकोवर हंडा मोर्चा


कळंबोली : अंतर्गत जलवाहिन्या जीर्ण झाल्याने कळंबोली वसाहतीतील एलआयजीमध्ये दूषित पाणी येत असल्याच्या तक्र ारी येत आहेत. त्यामुळे कळंबोलीकरांचे आरोग्य धोक्यात असल्याचा मुद्दा उपस्थित करून शिवसेनेने हंडा मोर्चा काढून सिडकोचे लक्ष वेधले. याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची ग्वाही सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप बोकाडे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
साडेतीन मीटर खाली असलेल्या कळंबोली वसाहत विकसित करताना सिडकोने ३५ वर्षांपूर्वी अंतर्गत जलवाहिन्या टाकल्या. त्या वेळी वाढत्या लोकवस्तीचा विचार करण्यात न आल्याने या वाहिन्यांवर आता भार येत आहे. त्यातच पावसाचे पाणी निचरून संबंधित जलवाहिन्या जीर्ण आणि जुनाट झाल्या आहेत. कित्येक ठिकाणी त्यांना गळती लागली असल्याने ड्रेनेजचे पाणी आतमध्ये शिरते. त्यातून पिण्याचे पाणी दूषित होत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. विशेष करून सेक्टर १ येथील एलआयजी कॉलनीत दूषित पाणी येत असल्याची स्थानिक रहिवाशांनी तक्रार केली होती. त्यानुसार बुधवारी शिवसेनेने स्थानिक रहिवाशांना बरोबर घेवून सिडको कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. यावेळी काही महिलांनी घरात येणाऱ्या दूषित पाण्याच्या बाटल्या भरून आणल्या होत्या. यावेळी शिवसैनिकांनी सिडकोविरोधात घोषणाबाजी करून शुध्द आणि मुबलक पाणी देण्याची मागणी केली.
पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप बोकाडे, सहाय्यक कार्यकारी अभियंता चंद्रहार सोनकुसरे आणि साहाय्यक अभियंता सूर्यकांत तिडके हे मोर्चाला सामोरे गेले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख शिरीष घरत, पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम, तालुकाध्यक्ष वासुदेव घरत, आत्माराम कदम यांनी एलआयजीतील दूषित पाण्याबाबत नाराजी व्यक्त केली आणि नेमकी वस्तुस्थिती अधिकाऱ्यांच्या समोर मांडली. अडीच महिन्यांपूर्वी या विषयावर आम्ही निवेदन सादर केले होते त्याचबरोबर चर्चाही झाली. मात्र प्रत्यक्षात त्याविषयी काहीच उपाययोजना करण्यात आली नसल्याबद्दल बबन पाटील, दीपक निकम यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. जुन्या झालेल्या वाहिन्यांमुळे अशा प्रकारे दूषित पाणी येत असल्याचे सिडको अधिकाऱ्यांनी मान्य केले. ज्या ठिकाणी दुरुस्ती शक्य आहे तिथे दुरुस्ती करू आणि ज्या वाहिन्या पूर्णच जीर्ण झाल्या त्या त्वरित बदलण्याचे आश्वासन दिले. यावेळी विभाग प्रमुख कृष्णकांत कदम, शहरप्रमुख डी.एन. मिश्रा, सूर्यकांत म्हसकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. (वार्ताहर)
शिवसेनेला आरपीआयची साथ
एलआयजीमधील दूषित पाण्याचा प्रश्न हाती घेवून शिवसेनेने सिडकोवर बुधवारी धडक दिली. त्यांच्यासोबत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाडही काही कार्यकर्त्यांसोबत सिडको कार्यालयात आले आणि हा प्रश्न निकाली काढण्याकरिता शिवसेनेला साथ दिली.

Web Title: Shivsena's Cidcoor Honda Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.