Shiv Sena Shinde Group Sanjay Shirsat: मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असल्याचे चित्र आहे. अनेक वर्ष पक्षासाठी काम केलेले लोकही उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत आहेत. अलीकडेच कोकणातील ठाकरे गटाचा मोठा चेहरा असणाऱ्या राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंना रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता ऑपरेशन टायगरची मोहीम आणखी तीव्र करणार असल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी याबाबत सूतोवाच केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटावर टीका केली. संजय शिरसाट म्हणाले की, आदित्य ठाकरे कधीपासून नेते झाले? खासदारांनी स्नेहभोजनाला परवानगी घेऊन जावे, असे वक्तव्य करुन आदित्य ठाकरे राजकारण करत असतील तर तो लाचारीचा कळस आहे. त्यांनी मातोश्रीची इज्जत घालवली, आमचे चुकले हे सांगायचे धाडस लागते. ऑपरेशन टायगर जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत. यादी करण्याचे काम सुरू आहे, आणखी एक मोठा प्रवेश सोहळा होणार आहे, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.
भास्कर जाधव जाधव तिथे राहणार नाहीत
'म्होरक्या जिद्दी व धाडसी असेल तर माणसेच काय जनावरे सुद्धा विश्वास ठेवतात', या भास्कर जाधव यांच्या सोशल मीडियावरील स्टेटसची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. यावर बोलताना, भास्कर जाधव यांच्या म्हणण्याचा अर्थ समजून घ्यावा. त्यांचा म्होरक्या धाडसी नाही, अशी भास्कर जाधव यांची मानसिकता झाली आहे. किती सत्यता आहे. स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या माणसावर आरोप केल्यावर कसे सहन करणार. जाधव तिथे राहणार नाहीत. भास्कर जाधव यांनी एकदा एखादा निर्णय घेतला की ते मागे हटत नाहीत. त्यामुळे येत्या महिनाभरात मोठे बदल होतील, असा दावा संजय शिरसाट यांनी केला.
दरम्यान, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी दोन वेगवेगळे फंड केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी जी काही मदत दिली, आरोग्य सेवेत काम करण्याची इच्छा एकनाथ शिंदे यांची आहे. तातडीने मदत देण्याच काम त्यांनी केले आहे. पुन्हा अशी योजना सुरू करत असेल तर स्पर्धा नाही. मुख्यमंत्री निधीसाठी निधी निश्चित मी देणार आहे. कोणतेही वॉर नाही, सर्वांनी मदत केली पाहिजे, असे शिरसाट म्हणाले.