पोलिसांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आता शिवसेनाही आक्रमक
By Admin | Updated: September 5, 2016 05:59 IST2016-09-05T05:59:06+5:302016-09-05T05:59:06+5:30
पोलिसांवरील हल्ल्यांबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता शिवसेनाही पोलिसांच्या बाजूने मैदानात उतरली आहे.

पोलिसांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आता शिवसेनाही आक्रमक
मुंबई : पोलिसांवरील हल्ल्यांबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता शिवसेनाही पोलिसांच्या बाजूने मैदानात उतरली आहे. पोलिसांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ७ सप्टेंबर रोजी पोलीस कुटुंबीयांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
वाहतूक पोलीस कर्मचारी विलास शिंदे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दिवंगत विलास शिंदे व मुंबई पोलिसांच्या काही कुटुंबीयांनी रविवारी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव यांची भेट घेतली. राज्यातील सर्व पोलीस असुरक्षित असून, पोलिसांवरील हल्ल्यास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी कुटुंबीयांनी केली. (प्रतिनिधी)
>उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार
पोलीस कुटुंबीयांना योग्य न्याय मिळवून देऊ, त्यासाठी
७ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे आश्वासनही
उद्धव ठाकरे यांनी पोलीस कुटुंबीयांना दिले.
हेल्मेट वगैरे प्रकरणावरून पोलिसांवर हल्ले होत राहिले
तर वर्दीऐवजी चिलखत पुरवावे लागेल. पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रकार शोभनीय नाहीत. पोलिसांच्या वर्दीला बळकटी देण्याची गरज आहे. मारले गेलेल्यांना केवळ ‘शहीद’ घोषित करून जबाबदारी झटकता येणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेने भाजपाला फटकारले होते.
>मनसेपाठोपाठ शिवसेना आक्रमक
राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सर्वप्रथम विलास शिंदे यांच्यावरील हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला होता; तसेच लीलावती रुग्णालयात जाऊन शिंदे कुटुंबीयांची विचारपूस केली. पोलिसांच्या प्रश्नांवर मनसेने घेतलेल्या भूमिकेपाठोपाठ सेनाही या प्रश्नात उतरली आहे.