शिवस्मारकाचा मुद्दा ठरणार निर्णायक
By Admin | Updated: January 21, 2017 02:55 IST2017-01-21T02:55:51+5:302017-01-21T02:55:51+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकासाठी भारतीय जनता पक्षाने चांगलीच मोर्चेबांधणी केली

शिवस्मारकाचा मुद्दा ठरणार निर्णायक
पूजा दामले,
मुंबई- छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकासाठी भारतीय जनता पक्षाने चांगलीच मोर्चेबांधणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा करुन मराठी मनाचा ठाव घेण्याच्या प्रयत्न भाजपाच्या मात्र अंगलट येण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील प्रस्तावित स्मारकाच्या जागेस मच्छीमारांचा कडाडून विरोध असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत हाच मुद्दा प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत.
काही दिवसांपूर्वीच २५ कोटी रुपये खर्च करुन प्रस्तावित शिवस्मारकाचे भूमी व जलपूजन करण्यात आले. अरबी समुद्रात हे स्मारक उभारल्यास मच्छिमारांच्या दैनंदिन व्यवहारावर याचा परिणाम होणार असल्याचे या परिसरातील मच्छीमारांचे म्हणणे आहे. त्यामुळेच ससून डॉक, कफ परेड, जमशेद या बंदरांमध्ये व्यवसाय करणाऱ्या मच्छिमारांचा या स्मारकाच्या ठिकाणाला प्रचंड विरोध आहे. महापालिकाच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून मुंबईत विविध विषयांवर श्रेय मिळवण्याचे प्रयत्न राजकीय पक्ष करत आहेत. ए वॉर्डमधील प्रभाग २२५ आणि २२६ मध्ये देखील श्रेयासाठी लगबग सुरु झाली आहे. शिवस्मारक हा या प्रभागांमध्ये कळीचा मुद्दा ठरणार आहे. या मुद्द्यावरुन दोन्ही प्रभागात काही प्रमाणात फूट पडली आहे. भाजपला काही ठिकाणी झुकते माप मिळत असले तरी मच्छीमारांचा विरोध त्यांना त्रासदायक ठरु शकतो.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारायचे असल्यास ते जमिनीवर अथवा रेसकोर्सच्या जागेवर उभारावे. सर्वच थोर पुरुषांची स्मारके रेसकोर्सवर उभारणे शक्य असल्याचे येथील मच्छिमारांचे म्हणणे आहे. या प्रभागात असणाऱ्या बंदरांवर सुमारे ८० ते ९० हजार लोकांची उपजिविका सुरु आहे. याठिकाणी स्मारक उभे राहिल्यास एवढ्या सर्व लोकांच्या उपजिविकेच्या साधनावर परिणाम होणार आहे. ससून डॉक बंद करुन थीम पार्क उभारण्याची घोषणाही भाजपने केली आहे. ससून डॉक हलवल्यास ते कुठे नेणार? याविषयी स्पष्टता नाही, असे स्थानिकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मच्छिमार झाले नाराज
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारायचे असल्यास ते जमिनीवर अथवा रेसकोर्सच्या जागेवर उभारावे. सर्वच थोर पुरुषांची स्मारके रेसकोर्सवर उभारणे शक्य असल्याचे येथील मच्छिमारांचे म्हणणे आहे.या बंदरांवर ९० हजार लोकांची उपजिविका सुरु आहे.