शिरोळे, कदम, पायगुडे की वारे ?
By Admin | Updated: May 16, 2014 04:18 IST2014-05-16T04:18:10+5:302014-05-16T04:18:10+5:30
लोकसभेसाठी महायुतीतर्फे अनिल शिरोळे, काँग्रेसचे विश्वजित कदम, मनसेचे दीपक पायगुडे व आपचे सुभाष वारे यांच्यात थेट लढत झाली आहे.

शिरोळे, कदम, पायगुडे की वारे ?
पुणे : लोकसभेसाठी महायुतीतर्फे अनिल शिरोळे, काँग्रेसचे विश्वजित कदम, मनसेचे दीपक पायगुडे व आपचे सुभाष वारे यांच्यात थेट लढत झाली आहे. विद्यमान खासदार सुरेश कलमाडी रिंगणाबाहेर असल्याने पुण्याच्या नव्या कारभार्याची माळ कोणाच्या गळ््यात पडणार? याची उत्सुकता उद्या संपणार आहे. पुणे लोकसभेसाठी २९ उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत चौरंगी आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील गैरव्यवहाराचे आरोप असल्याने विद्यमान खासदार सुरेश कलमाडी यांना काँग्रेसने तिकीट नाकारले. त्याचवेळी राहुल गांधी यांच्या गोटातून युवक प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांना नवा चेहरा म्हणून उमेदवारी मिळाली. विश्वजित यांच्यासाठी राहुल गांधी, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सभा घेतल्या. शिवाय पहिल्यांदाच राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी एकत्रित निवडणूक लढविल्याचे चित्र शेवटपर्यंत होते. महायुतीतर्फे उमेदवारीसाठी आमदार गिरीश बापट व शहराध्यक्ष अनिल शिरोळे यांच्यात चुरस होती. परंतु, गेल्या लोकसभा निवडणुकीत २५ हजार मताने पराभूत झालेले गोपीनाथ मुंडेसमर्थक अनिल शिरोळे यांनी उमेदवारी मिळविण्यात बाजी मारली. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा यंदा तब्बल १४ टक्के अधिक मतदान झाले. तसेच, काँग्रेस आघाडीचे आमदार असलेले मतदारसंघ वडगावशेरी, शिवाजीनगर व कॅन्टोन्मेंटमध्ये मतदानाची टक्केवारी ५० ते ५३ टक्के इतकी आहे. त्याचवेळी महायुतीचा प्रभाव असलेले कसबा, कोथरूड व पर्वती मतदार संघातील मतदानाची टक्केवारी ५४ ते ६२ टक्के आहे. शिरोळे यांना मोदी लाटेचा फायदा होणार की, विश्वजित कदम यांना प्रचारातील आघाडी तारणार, याची उत्सुकता आहे.