मुख्यमंत्र्यांविरोधात शरद राव आक्रमक
By Admin | Updated: June 14, 2014 04:46 IST2014-06-14T04:46:33+5:302014-06-14T04:46:33+5:30
फेरीवाला, महानगरपालिका आणि रिक्षा चालक-मालक संघटनांचे नेतृत्व करणाऱ्या शरद राव यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे

मुख्यमंत्र्यांविरोधात शरद राव आक्रमक
मुंबई : फेरीवाला, महानगरपालिका आणि रिक्षा चालक-मालक संघटनांचे नेतृत्व करणाऱ्या शरद राव यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रिक्षा चालक-मालक, फेरीवाले आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनांची घोषणा करत राव यांनी मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.
राज्य सरकारने नेमलेल्या हकिम समितीच्या अहवालानुसार, रिक्षा चालकांना पहिल्या टप्प्यासाठी किमान भाडे म्हणून १८ रुपये देण्याची मागणी राव यांनी केली आहे. आॅटोरिक्षा धंद्याच्या विविध घटकांच्या किमतीत झालेली वाढ आणि घट याचा आढावा या समितीने घेतला होता. त्यानुसार पायाभूत भाडे ठरवून भाडेसारिणी तयार करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. १ मे २०१३ रोजी या सूत्रानुसार रिक्षाचालकांना ४६ पैशांची भाडेवाढ देण्याची गरज होती मात्र ती मिळाली नाही. त्यामुळे १५ लाख रिक्षाचालक आणि मालकांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे राव यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘१ मे २०१४पासूनचे किमान भाडे ठरविण्याबाबत कोणत्याही न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही. तरीही मुख्यमंत्री उदासीन असल्याने रिक्षा चालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
२० जूननंतर रिक्षाचालकांचे आंदोलन
२० जूनपर्यंत शासनाने भाडेवाढ दिली नाही, तर एकाच दिवशी राज्यातील १५ लाख रिक्षाचालक आणि मालक त्या-त्या जिल्ह्यातील वाहतूक आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करतील. नेमके कोणत्या दिवशी आंदोलन करणार, याबाबत राव यांनी सांगितले नाही.
...तर पालिकाही बंद करणार
सध्या मुंबई वगळता इतर महापालिकांत लावलेल्या एलबीटीमुळे १६ हजार ५०० कोटी रुपयांचा महसूल मिळत आहे. मात्र एलबीटी रद्द करून व्हॅटवर अतिरिक्त भार लावल्यास केवळ ७६० कोटींचा महसूल मिळणार आहे. त्यामुळे ज्या दिवशी शासन एलबीटी रद्द करेल किंवा एलबीटीच्या धोरणात बदल करेल, त्या रात्रीपासून सर्व महापालिका कामबंद आंदोलन करू,’ असा इशारा राव यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)