शनिचौथऱ्याचा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे

By Admin | Updated: January 8, 2016 03:47 IST2016-01-08T03:47:07+5:302016-01-08T03:47:07+5:30

शनिशिंगणापूरमध्ये २६ जानेवारीला चौथऱ्यावर चढून धार्मिक प्रथा मोडण्याचा संकल्प ‘भूमाता ब्रिगेड’ने केला आहे. तर, त्यांना रोखण्यासाठी ‘हिंदू जनजागृती समिती’ने पुढाकार घेतला आहे.

Shani Saturn's Debate Rekindles Signs | शनिचौथऱ्याचा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे

शनिचौथऱ्याचा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे

अहमदनगर : शनिशिंगणापूरमध्ये २६ जानेवारीला चौथऱ्यावर चढून धार्मिक प्रथा मोडण्याचा संकल्प ‘भूमाता ब्रिगेड’ने केला आहे. तर, त्यांना रोखण्यासाठी ‘हिंदू जनजागृती समिती’ने पुढाकार घेतला आहे. राज्यातील ‘धर्मरक्षण मोहिमे’चा तिथून प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक सुनील धनवट यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, धार्मिक प्रथांमध्ये हस्तक्षेप करू नये, असा निर्णय कोर्टाने पूर्वीच दिला आहे. याअर्थाने प्रथा मोडणाऱ्यांना घटनाद्रोहीच ठरविले पाहिजे. १९ संघटना राज्यभर धर्मरक्षण मोहीम सुरू करणार आहेत. त्याचा प्रारंभ २६ जानेवारीला शनिशिंगणापूरला होईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
परिवर्तनाची नांदी - सुळे
नाशिक : गेल्या ५३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच शनिशिंगणापूर विश्वस्तपदी महिलांची झालेली निवड ही महिला सबलीकरण व परिवर्तनाची नांदीच असल्याचे मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
एका कार्यक्रमानिमित्त येथे आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमी महिलांच्या पाठीशी उभा राहिला आहे. गेल्या दोन वर्षांत घडलेल्या पुरोगामी विचारवंतांच्या हत्या दुर्दैवी आहेत. त्यांच्या तपासाला गती यावी, अशी मागणी आपण केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना भेटून केली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालून तपासाला गती
द्यावी.’

Web Title: Shani Saturn's Debate Rekindles Signs