उष्माघाताचे आणखी सात बळी
By Admin | Updated: June 9, 2014 01:15 IST2014-06-09T01:15:59+5:302014-06-09T01:15:59+5:30
विदर्भात उन्हाचा तडाखा कायम आहे. रविवारी विदर्भात आणखी सात जणांचा उष्माघाताने बळी झाला. यात नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश आहे.

उष्माघाताचे आणखी सात बळी
विदर्भात सूर्याचे आग ओकणे सुरुच : नागपूर ४७.३ अंशावर
नागपूर/अमरावती/चंद्रपूर : विदर्भात उन्हाचा तडाखा कायम आहे. रविवारी विदर्भात आणखी सात जणांचा उष्माघाताने बळी झाला. यात नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील सहा जणांचा समावेश आहे. गेल्या ४८ तासांतील उष्माघाताच्या बळींची संख्या २२ वर पोहोचली आहे.
नागपूरमध्ये सर्वाधिक ४७.३, वर्धा ४७.३ आणि गोंदिया येथे ४७.१ अंशापर्यंत पारा पोहोचला होता. विदर्भात उर्वरित जिल्ह्यात पारा उच्चांकावर आहे. रविवारी नागपूर रेल्वेस्थानकावर उष्माघातामुळे दोघांचा बळी गेल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दुपारी ३.२0 वाजता एका अनोळखी महिलेचा मृतदेह नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील भागात असलेल्या बुकिंग कार्यालयाच्या गेटजवळ पडून असल्याची बाब उपस्टेशन व्यवस्थापकांनी लोहमार्ग पोलिसांना सांगितली. संबंधित महिलेचे वय ६५ वर्ष असून रंग सावळा, उंची ५ फूट ३ इंच आहे.
१२७२४ एपी एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकावर सकाळी १0.३0 वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर आली. या गाडीच्या शौचालयाजवळ एका ६0 वर्षाच्या अनोळखी इसमाचा मृतदेह पडून होता. संबंधित इसमाची उंची ५ फूट १0 इंच दोन्ही मृतदेह लोहमार्ग पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविले आहेत. अमरावती जिल्ह्यात उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना दर्यापूर व धामणगाव तालुक्यात घडली. धामणगाव रेल्वे तालुक्यात निंभोरा (बोडखा) येथील ज्ञानेश्वर नवृत्ती बढीये (४८) व दर्यापूर तालुक्यात आमला येथील पूनम संदीप महात्मे (२२) अशी मृतांची नावे आहे.
निंभोरा बोडखा येथील ज्ञानेश्वर बढीये हे रविवारी सकाळी शेतात कामाला गेले होते. कडक उन्हाने जीवाची काहिली होताना त्यांना पिण्यासाठी पाणीही मिळाले नाही. पाणी पिण्यासाठी म्हणून ते दुपारी घराकडे येण्यासाठी निघाले. दरम्यान रस्त्यातच ते कोसळले व त्यांचा मृत्यू झाला. दर्यापूर तालुक्यात आमला येथील पूनम महात्मे यांना ऊन लागल्याने ताप आला.
त्यांना दर्यापूरच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. इकडे वर्धा जिल्ह्यातील खरांगणा पोलीस स्टेशन अंतर्गत मांडवा (पोड) येथील एका महिलेचा आणि यवतमाळ जिल्ह्यातील वाढोणा (बाजार) येथील एका तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला.
मांडवा (पोड) येथे विमला कृष्णा नाईक (६५) ही महिला शेतात काम करत असताना शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास उष्माघाताचा आघात झाला. त्या आपल्या नातवंडासोबत शेतातील काडी-कचरा वेचण्यासाठी गेल्या होत्या. शेतात असताना एकाएकी चक्कर येऊन त्या खाली पडल्या. त्यांच्या नातवाने ही माहिती कुटुंबाला दिली.
नातेवाईकांनी शेताकडे धाव घेतली असता महिलेचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. वाढोणा (बाजार) येथील अरुण पांडुरंग डंभारे (३६) शनिवारी येथील एका लग्नसमारंभात सहभागी झाला होता. दरम्यान, लगतच्या मंदिरात गेलेल्या नागरिकांना तो सायंकाळी ६ वाजता मृतावस्थेत आढळून आला. चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील मायावतीनगर परिसरात राहणारे जनार्धन माणिक दुधे (७९) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. ही घटना रविवारी उघडकीस आली.
जनार्धन दुधे घराच्या वरच्या माळ्यावरील खोलीत आराम करण्यासाठी गेले होते. मात्र रविवारी सकाळी ते मृतावस्थेत आढळले. (प्रतिनिधी)