लाखांवर जात पडताळणी प्रमाणपत्रांचा निपटारा
By Admin | Updated: May 23, 2014 01:05 IST2014-05-23T01:05:40+5:302014-05-23T01:05:40+5:30
नागपूर विभागातील तीन समित्यांनी एक वर्षात सरासरी एक लाखांवर जात पडताळणी प्रमाणपत्रांचा निपटारा केला आहे. जात पडताळणीसाठी राज्य शासनाने आॅनलाईन प्रक्रियेचा अवलंब केला

लाखांवर जात पडताळणी प्रमाणपत्रांचा निपटारा
आॅनलाईन प्रक्रिया अर्ज भरण्यापुरतीच : पडताळणीसाठी तीन समित्या
नागपूर : नागपूर विभागातील तीन समित्यांनी एक वर्षात सरासरी एक लाखांवर जात पडताळणी प्रमाणपत्रांचा निपटारा केला आहे. जात पडताळणीसाठी राज्य शासनाने आॅनलाईन प्रक्रियेचा अवलंब केला असला तरी, ती फक्त अर्ज भरण्यापुरतीच मर्यादित आहे. इतर कामे ही पूर्वीच्याच पद्धतीने केली जात आहे. नागपूर विभागात जात पडताळणीसाठी तीन समित्या आहेत. एक नागपूर जिल्ह्यासाठी, दुसरी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी व तिसरी भंडारा, वर्धा व गोंदिया जिल्ह्यांसाठी आहे. विभागाचे अतिरिक्त आयुक्त एस.जी. गौतम अध्यक्ष आहेत. एप्रिल २०१३ ते एप्रिल २०१४ या एक वर्षात तीनही समित्या मिळून सरासरी एक लाखांवर प्रमाणपत्रांचा निपटारा करण्यात आला आहे. यात विद्यार्थ्यांचे, कर्मचार्यांचे, निवडणुकीसाठी आलेले व इतर कामांसाठी आलेल्या प्रमाणपत्रांचा समावेश आहे. भंडारा-गोंदिया-वर्धा जिल्ह्याच्या समितीने (क्रमांक १) एका वर्षात त्यांच्याकडे आलेल्या एकूण प्रमाणपत्रांपैकी ३८,७९० प्रमाणपत्रे निकाली काढली. यात विद्यार्थ्यांचे ९,६५३, सेवाविषयक २४,६२३, निवडणुकीची ४,४६९ आणि इतर ४५ प्रमाणपत्रांचा समावेश आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या समितीने (समिती क्र. २) एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ या काळात त्यांच्याकडे आलेल्या एकूण प्रकरणांपैकी २४,०६० प्रकरणांचा निपटारा केला. यात शैक्षणिक ६,६५७, सेवाविषयक १६,१७८, निवडणुकीशी संबंधित २६७ आणि इतर ९५८ प्रकरणांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्याच्या समितीकडे (समिती क्र. ३) २०१३-१४ या काळात शैक्षणिक १८१०, सेवाविषयक २४,१८८, निवडणुकीसाठी १३५६ अशी एकूण ४३,७२४ प्रकरणे आली होती. त्यापैकी ४२,०९९ प्रकरणे वैध ठरली तर ४८ अवैध ठरली. (प्रतिनिधी)