Shiv Sena Shinde Group And Thackery Group News: आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील, असा कयास बांधला जात आहे. विधानसभेतील विजयाची लय कायम ठेवण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जात आहे. तर महाविकास आघाडी पराभवाचा वचपा काढण्यासाठी सर्व जोर पणाला लावत आहे. परंतु, यातच ठाकरे गटाला पडलेले पक्ष गळतीचे भगदाड वाढताना पाहायला मिळत आहे.
शिंदेसेना शिंदे गट व उद्धवसेना हे दोन्ही पक्ष वर्धापनदिनाच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत. विशेष करून मुंबईत पालिका निवडणुकीपूर्वी या सोहळ्यांना महत्त्व आहे. विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर एकामागून एक माजी नगरसेवक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गट, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सामील होताना दिसत आहेत. पक्षाला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. परंतु, आता ही गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पक्ष सोडून जाऊ नये, यासाठी ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी शर्थीचे प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अन्यथा महापालिका निवडणुकीत ठाकरे गटासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते, असा कयास बांधला जात आहे.
तू कुठेही जायचे नाहीस, मोहरे रोखण्याचा प्रयत्न
उद्धवसेनेतील जेवढे मासे गळाला लावता येतील तेवढे लावण्यासाठी गेले २० दिवस शिंदेसेनेच्या नेत्यांनी रात्रीचा दिवस केला. उद्धवसेनेतील अस्वस्थ नेते हेरून त्यांना रात्री अनोळखी क्रमांकावरून फोन करत मेळाव्यात प्रवेशाची ऑफर दिली. उद्धवसेनेला याची कुणकुण लागताच या पक्षाचे नेतेही रात्री जागून काढू लागले. एखाद्या नेत्याला फोन आला हे कळताच उद्धवसेनेचे नेते फोन करून 'तू कुठेही जायचे नाहीस', यासाठी दबाव, विनंती सुरू आहे. शिंदेसेनेला 'आपण किती मोहरे फोडले' हे दाखवायचे आहे. तर उद्धवसेनेला 'आपण किती मोहरे रोखले' हे दाखवायचे आहे, असा हा खेळ आहे, अशी माहिती मिळाली आहे.
दरम्यान, ठाकरे गट आणि मनसे यांची युती होऊ शकते, याबाबत दोन्ही बाजूंनी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. इतकेच नव्हे, तर नेतेही सकारात्मक दिसत आहेत. परंतु, दोन्ही पक्षाचे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे नेमका निर्णय कधी घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. एकीकडे मनसेशी युतीबाबत चर्चा आणि दुसरीकडे रिकामा होत असलेला पक्ष या दोन्ही आघाड्यावर ठाकरे गटाला लढावे लागत असल्याचा सूर राजकीय वर्तुळातून उमटत आहे.