सर्वोपचारमध्ये शस्त्रक्रियेला ‘कात्री’
By Admin | Updated: June 19, 2014 22:07 IST2014-06-19T21:27:41+5:302014-06-19T22:07:43+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रुग्णांवरील प्रयोगामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला असतानाच आता गत चार महिन्यांपासून शस्त्रक्रिया विभागही बंद केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

सर्वोपचारमध्ये शस्त्रक्रियेला ‘कात्री’
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रुग्णांवरील प्रयोगामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला असतानाच आता गत चार महिन्यांपासून शस्त्रक्रिया विभागही बंद केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. दुरुस्तीच्या नावाखाली शस्त्रक्रिया विभागात केवळ गंभीर आजारी रुग्णांची शस्त्रक्रिया केली जात आहे. सामान्य कुटुंबातील शेकडो रुग्णांचे किरकोळ आजार शस्त्रक्रियेअभावी गंभीर रूप धारण करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मेडिकल प्रवेशाच्या जागा वाढवून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एमसीआयने ठरवून दिलेल्या निकषानुसार येथे असलेल्या सुविधा व जागा अपुरी पडत आहे. या सुविधा उपलब्ध करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने काही वॉर्डांमध्ये शिकवणी वर्ग दाखवून त्या ठिकाणची देखभाल दुरुस्ती सुरू केली आहे. या वॉर्डातील रुग्णांना व्हरांड्यात ठेवण्यात आले असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शस्त्रक्रिया विभागाचीही तीच परिस्थिती असून, त्यामुळे हा विभाग मार्च महिन्यापासून केवळ नावालाच सुरू आहे. गंभीर आजारी रुग्णाची एखादी शस्त्रक्रिया करण्यात येत आहे, मात्र इतर रुग्णांकडे टाळाटाळ करण्यात येत आहे.
गंभीर आजारी रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात येत असल्या तरी इतर शेकडो रुग्णांना मागील तीन ते चार महिन्यांच्या कालावधीत शस्त्रक्रियेसाठी दोन ते तीन महिन्यांनंतरची तारीख देण्यात येत आहे. दोन महिने त्रास सहन करण्याचा सल्लाही येथील डॉक्टर देत असल्याने रुग्णांचा जीव एका आरोग्य संस्थेतच किती स्वस्त झालाय, हे दिसून येत आहे. देखभाल दुरुस्तीची कामेही थंडबस्त्यात सुरू असल्याने या रुग्णांना पावसाळय़ात त्रास सहन करावा लागणार आहे. शस्त्रक्रिया विभाग नावापुरता सुरू असल्याने वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला रुग्णांविषयी कुठलाही कळवळा नसल्याचे स्पष्ट होत आहे.
** रुग्णांना पाण्यात झोपावे लागणार..
पावसाळय़ाच्या तोंडावर वैद्यकीय महाविद्यालयातील काही वॉर्डांची देखभाल दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांना ब्लड बँकेसमोरील पॅसेजमध्ये ठेवण्यात आले आहे. या जागेत पावसाळय़ाचे पाणी घुसणार असल्याने या रुग्णांना पावसाळय़ात पाण्यामध्ये झोपावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.
** शस्त्रक्रिया विभागातील वास्तव
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शस्त्रक्रिया विभागात केवळ गंभीर आजारी रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. मात्र ज्या रुग्णांचे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे किरकोळ आजारी रुग्णांचे आजार वाढत असून, त्यांना चिंताजनक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
** या शस्त्रक्रिया रखडल्या
शरीरावर गाठ असल्यास ती शस्त्रक्रिया तत्काळ करणे आवश्यक आहे, मात्र अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात येत नसल्याने ही गाठ वाढून रुग्णांना मोठा आजार होण्याचा धोका होत आहे. अँपेंडिक्स, अल्सर, हर्निया यासारख्या आजारांच्या शस्त्रक्रिया रखडल्या असून, त्यांना दोन महिन्यांनंतरची तारीख देण्यात येत आहे.
** बांधकामाच्या नावाखाली रुग्णांची हकालपट्टी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयातील काही वॉर्डांचे बांधकाम व देखाभाल दुरुस्ती करण्यात येत असल्याने रुग्णांची सरळ-सरळ हकालपट्टी करण्यात येत आहे. या प्रकरणाविषयी नव्यानेच रुजू झालेले वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राठोड यांना काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसून येत आहे.