‘व्हॉट्सअॅप’ने जागवल्या शालेय आठवणी
By Admin | Updated: August 22, 2016 02:58 IST2016-08-22T02:58:57+5:302016-08-22T02:58:57+5:30
महाविद्यालयात कितीही मोकळीक मिळाली असली तरी शाळेतील शिस्त आजही तेवढीच हवीहवीशी वाटत असते.

‘व्हॉट्सअॅप’ने जागवल्या शालेय आठवणी
मुंबई : महाविद्यालयात कितीही मोकळीक मिळाली असली तरी शाळेतील शिस्त आजही तेवढीच हवीहवीशी वाटत असते. त्यामुळे शाळेतील आठवणींना उजाळा देण्यासाठी विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवार नगर येथील उत्कर्ष बाल मंदिर शाळेत नुकतेच माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन पार पडले. व्हॉट्सअॅपमुळे हे सर्व विद्यार्थी एकत्र आले. या स्नेहसंमेलनात आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या ओठांवर काही क्षणांसाठी का होईना, फिरसे मुझे स्कूल में जाने दो ना जरा... या गाण्यांच्या ओळी आल्या.
बाल उत्कर्ष मंदिर शाळेत १९९१-९२मध्ये दहावीच्या वर्गात शिकणारे ६० विद्यार्थी तब्बल दोन तपांनी म्हणजेच २४ वर्षांनी पुन्हा आपल्या शाळेत एकत्र आले. केवळ व्हॉट्सअॅपच्या साध्या संदेशातून हे विद्यार्थी एकत्र आले. या बॅचच्या चार-पाच विद्यार्थ्यांची अवचित भेट झाली आणि व्हॉट्सअॅपवर त्यांनी ग्रुप तयार केला.
सकाळी ११ वाजता शाळेची घंटा वाजली व तासिका सुरू झाली. हे सर्व माजी विद्यार्थी जुन्याच वर्गात बसले होते. शाळेचे संचालक नार्वेकर सरांनी सरस्वती पूजन केले. गंमत म्हणजे त्या वेळी वर्गात असलेली मस्तीखोर मुले आताही तेव्हाप्रमाणेच मागच्या बाकांवर शांतपणे स्मितहास्य करत बसली होती. वंदे मातरम्ने सुरू झालेली ही अनोखी शाळा गप्पा, आठवणींना उजाळा देत ‘जन गण मन’ म्हणून सुटली. पण इतक्या वर्षांनी भेटलेले सगळे विद्यार्थी ओलावलेल्या पापण्यांनी निरोप घेताना दिसून आले. (प्रतिनिधी)
>१९९१-९२ मध्ये दहावीच्या वर्गात शिकणारे ६० विद्यार्थी तब्बल दोन तपांनी म्हणजेच २४ वर्षांनी पुन्हा शाळेत एकत्र आले. व्हॉट्सअॅपच्या साध्या संदेशातून हे विद्यार्थी एकत्र आले. या बॅचच्या चार-पाच विद्यार्थ्यांची अवचित भेट झाली आणि त्यांनी ग्रुप तयार केला.