भूतबाधा टाळण्यासाठी शाळेला ‘लिंबू-मिरची’!
By Admin | Updated: December 25, 2014 03:10 IST2014-12-25T03:10:11+5:302014-12-25T03:10:11+5:30
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी शाळांमधून विज्ञानाधारित शिक्षण देणे अपेक्षित असताना गडचिरोली जिल्ह्यात शाळेने

भूतबाधा टाळण्यासाठी शाळेला ‘लिंबू-मिरची’!
रवि रामगुंडेवार,एटापल्ली (जि़ गडचिरोली)
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी शाळांमधून विज्ञानाधारित शिक्षण देणे अपेक्षित असताना गडचिरोली जिल्ह्यात शाळेने अंधश्रद्धेचा धडा गिरवला. विद्यार्थ्यांना भूतबाधा होऊ नये म्हणून शाळेला भारलेली लिंबू-मिरची बांधण्यात आली! एटापल्ली तालुक्यातील पंदेवाही विनोबा भावे आश्रमशाळेत हा प्रकार घडला़
दुर्गम भागातील पंदेवाही आश्रमशाळेची सहावीची विद्यार्थिनी सुनीता कुल्ले ओकसा हिचा १ डिसेंबर रोजी मलेरियाने मृत्यू झाला. त्यानंतर जवळपास पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना विविध आजारांनी ग्रासले. या आजारी विद्यार्थ्यांवर औषधोपचार करण्याऐवजी शाळेच्या शिक्षकांनी वेगळीच ‘मात्रा’ लागू केली. विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे इतर विद्यार्थ्यांना भूतबाधा झाल्याचा संशय व्यक्त करीत गावातील काही ग्रामस्थांनी मुख्याध्यापकांसह शिक्षक व पालकांच्या उपस्थितीत आश्रमशाळेत पूजाविधी केला. भारलेले लिंबू-मिरची संपूर्ण वर्गखोल्या व निवासी खोल्यांना बांधण्यात आले!
आश्रमशाळेत घडलेल्या अंधश्रद्धेच्या या प्रात्यक्षिकाबाबत मुख्याध्यापकाकडे विचारणा केली असता, ग्रामस्थांच्या दबावापोटी पूजापाठ केल्याचे त्यांनी कबूल केले. तर या घटनेची माहिती मिळताच
भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे निरीक्षक डॉ. ललित कायरकर यांनी शाळेला भेट देऊन गावकऱ्यांचे जबाब नोंदवले. परंपरेनुसार आपण शाळेत लिंबू- मिरच्या बांधल्या, असे पालकांनी
जबाबात नमूद केले.