वाचवा नैसर्गिक स्रोतांच्या खाणी : पवित्र वने
By Admin | Updated: July 1, 2016 01:53 IST2016-07-01T01:53:04+5:302016-07-01T01:53:04+5:30
भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून काही नैसर्गिक घटक उदा. : नद्या, गुहा, डोंगर, वने, विशिष्ट वृक्ष, काही प्राणी इ. देवासाठी राखून ठेवण्याची परंपरा आहे.

वाचवा नैसर्गिक स्रोतांच्या खाणी : पवित्र वने
भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून काही नैसर्गिक घटक उदा. : नद्या, गुहा, डोंगर, वने, विशिष्ट वृक्ष, काही प्राणी इ. देवासाठी राखून ठेवण्याची परंपरा आहे. यातली प्रचलित असणारी परंपरा म्हणजे ‘देवराई’- देवासाठी राखून ठेवलेले पवित्र वन. पिढ्यान् पिढ्या ही वने त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांनी तेथील असलेल्या रूढी, परंपरा, संस्कृती या गोष्टींमुळे टिकवून ठेवली. आत्ताच्या अंदाजानुसार संपूर्ण भारतात मिळून अशा छोट्या-मोठ्या वनांची संख्या सुमारे ३ लाखांपेक्षा जास्त आहे. देवाच्या भीतीने अशा वनांमध्ये तोड केली जात नव्हती. तोड केल्यास देव कोपेल आणि कठोर शिक्षा देईल, या भाबड्या समजुतीपोटी तेथील वनसंपदा वर्षानुवर्षे सुस्थितीत राखली गेली. निसर्ग-अभ्यासकांनी देवराईमधील दुर्मिळ वनस्पती, प्रदेशनिष्ठ वन्यजीव, औषधी वनस्पती यांच्या विस्तृत नोंदी केल्या. परंतु, जोमाने वाढणारे शहरीकरण, तरुण पिढीमधील कमी होत चाललेला विश्वास, यामुळे अनेक देवराया नष्ट होऊ लागल्या आहेत. परंतु, आता वेळ आली आहे ती ‘नोंदींच्या’ पलीकडे जाऊन प्रत्यक्ष कृती करण्याची, त्या कशासाठी टिकवून ठेवायच्या, हे समजून घेण्याची.
कर्नाटकात देवराई असलेल्या २ गावांचा तुलनात्मक अभ्यास केला गेला. दोन्ही देवराया मोठ्या होत्या (>१० हेक्टर). त्यांमध्ये पाण्याचा नैसर्गिक पाझर, उगम होता. त्या पाण्याचा उपयोग गावाच्या पिण्यासाठी व आजूबाजूच्या शेतीसाठी व्हायचा; परंतु एका गावाने कोळशासाठी म्हणून देवराई ठेकेदाराला विकली. नंतर केलेल्या तुलनात्मक अभ्यासात असे आढळून आले, की ज्या गावामध्ये देवराई टिकून होती त्या गावामधील विहिरींना वर्षभर पुरेसा पाणीसाठा होता. याउलट, जेथील देवराई नष्ट झाली होती त्या गावामध्ये सुमारे ५ लाख रुपये खर्च करून पिण्याच्या पाण्याचे टँकर मागवावे लागले. देवराईमध्ये असलेल्या पाण्याच्या स्रोतामुळे नजीकच्या भूजलस्रोतांमध्ये होणारी वाढ देवराईचे महत्त्व दर्शविते.
जैविक शेतीचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. एका अभ्यासानुसार, भातशेतामधील कीटक खाण्यासाठी येणारे बगळे जवळ असलेल्या देवराईमध्ये अधिवास (हेरोनरी) करताना आढळून आले. याच बगळ्यांची विष्ठा शेतीसाठी चांगल्या प्रकारचे खत म्हणून वापरली गेली, तसेच किडीचे नियंत्रणदेखील झाले आणि त्यामुळे चांगले उत्पन्न मिळाले.
अनेक पक्षी, प्राणी, कीटक यांना अधिवास पुरविण्यात देवराईचे मोठे योगदान आहे. देवराईतील मोठमोठ्या वृक्षांवर मधमाश्यांची पोळी दिसून येतात. परागीकरणाची क्षमता असणारे अनेक कीटक देवराईमध्ये सापडतात. जवळ असणाऱ्या शेतांमधील पिकांना, फळबागांना याचा फायदा होऊन त्या शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांपेक्षा चांगल्या दर्जाचे उत्पादन व वाढ मिळते, असे अभ्यासकांनी दाखवून दिले आहे.
स्थानिक लोकांनी घालून दिलेल्या नियमांमुळे टिकून राहिलेले मोठे वृक्ष, त्यांपासून तयार होणारा पालापाचोळा, त्याचे कुजून झालेले खत, राईमध्ये असलेला थंडावा यामुळे देवराईमधील जमीन खूप सुपीक असते. मातीमध्ये अनेक उपयुक्त क्षार आणि जैविक घटक असतात. त्यामुळे पाऊस पडला, की अशा मातीवरून वाहिलेल्या पाण्यामुळे आजूबाजूच्या शेतीला फायदाच होतो.
आम्ही गरवारे महाविद्यालयाच्या जैवविविधता विभागातर्फे गेली काही वर्षे पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील देवरायांचा अभ्यास केला. या अभ्यासांतर्गत देवराईचा इतिहास, सद्य:स्थिती, तिचे व्यवस्थापन, तेथील रूढी, परंपरा, कथा, उत्सव यांचा समावेश होता. यातून गावातल्या समस्या, भांडणतंटे सोडविण्याची जागा व सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने असलेले देवराईचे अनन्यसाधारण महत्त्व जाणवले. ठिकाण, स्थानिक लोकांचे देवराईशी असलेले नाते, अवलंबन, वेगवेगळ्या वायोगटांमध्ये देवराईबद्दल असलेली जाणीव हे पैलू नोंदवले.
ताम्हिणी घाटावरील कालकाई देवीच्या राईत जाणा-येणाऱ्या लोकांनी तिथले पावित्र्यच धोक्यात आले आहे. शेतीमुळे कोकणातील देवराया लहान होत चालल्या आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर वर सांगितलेल्या फायद्यांचा विचार करता, देवराया टिकवून ठेवण्यासाठी चळवळ उभी केली पाहिजे; ज्यामध्ये विद्यार्थी, संशोधक, निसर्ग-अभ्यासक आणि स्थानिक लोक यांचा एकत्र सहभाग असेल. आता गरज आहे ती निसर्गसंवर्धनासाठी एकत्रित कृतीची.
यासाठी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने भारतातील १५ राज्यांमध्ये एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. देवराईपासून मिळणारे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष फायदे समजून घेऊन त्याचे सुयोग्य व्यवस्थापन स्थानिक पातळीवर कसे करता येईल, याची तेथील लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हे यात अंतर्भूत आहे. भारत सरकारने संमत केलेल्या ‘जैवविविधता कायद्यां’तर्गत लोकसहभागाने गावाचे ‘जैवविविधता नोंदणी पुस्तिका’ तयार करणे, त्यामध्ये देवारायांचा अंतर्भाव करणे व अशा देवरायांना ‘नैसर्गिक वारसा स्थळा’चा दर्जा देणे, अशा प्रकारची पुढील दिशा असू शकते. नष्ट होत चाललेल्या देवरायांचे पुनरुज्जीवन, तेथील स्थानिक वनस्पती प्रजातींची तेथेच लागवड, दुर्मिळ प्रजातींचे संवर्धन, त्यांचा सुयोग्य वापर या सर्वांची आपल्या संस्कृती, परंपरेशी सांगड घालूनच हे शक्य आहे.