‘सैराट’ने तरुण पिढीचे वाटोळे केले!
By Admin | Updated: June 27, 2016 04:38 IST2016-06-27T04:38:28+5:302016-06-27T04:38:28+5:30
कमी वेळेत भरपूर पैसा कमविण्यासाठी दिग्दर्शक, निर्माता ‘सैराट’सारखे चित्रपट काढतात.

‘सैराट’ने तरुण पिढीचे वाटोळे केले!
हिवरेबाजार (अहमदनगर) : कमी वेळेत भरपूर पैसा कमविण्यासाठी दिग्दर्शक, निर्माता ‘सैराट’सारखे चित्रपट काढतात. त्यामुळे तरुण पिढी बरबाद होते. ‘सैराट’ने तरुण पिढीचे वाटोळे केले. स्वत:च्या पायावर उभे राहा, शिक्षण पूर्ण करा, मग सैराट व्हा, असा सल्ला जलसंधारण तथा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी येथे तरुणांना दिला.
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ने मराठी चित्रपटाच्या उत्पन्नाचे सर्व विक्रम मोडले आहेत. मराठी रसिकांना या चित्रपटाने वेड लावले आहे. एवढेच नव्हेतर, मराठीतील या लोकप्रिय चित्रपटाचा आता तेलगु, कन्नड, तमीळ आणि मल्याळम् भाषेत रिमेक होणार आहे. तेलगु चित्रपट स्वत: नागराज दिग्दर्शित करणार असल्याचे समजते. शिवतारे यांनी मात्र अशा चित्रपटांमुळे तरुण पिढी बरबाद होते, अशी भीती व्यक्त केली आहे. तरुणांनी अभ्यासात लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे त्यांनी हिवरेबाजार (ता. नगर) येथील जलसंधारण व विकासकामांची पाहणी केल्यानंतर सांगितले.
देशाचा विकास करायचा असेल तर अगोदर गावे सुधारली पाहिजेत. ग्रामीण भागासाठी सरकारी योजना भरपूर आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होणे गरजेचे आहे. त्यासाठी गावकऱ्यांचे संघटन व एकोपा महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी गावकऱ्यांना सांगितले.
पोपटराव पवार यांच्यासारखे अभ्यासू नेतृत्व गावाला लाभले. निवडणूक बिनविरोध झाली तर गावाचा आपोआप विकास
होईल.
जलयुक्त शिवार योजनेमुळे पाण्याची पातळी वाढणार आहे. शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवतारे यांच्या हस्ते गावात वृक्षारोपणही करण्यात आले.
रविवारची सुट्टी असूनही येथील आरोग्य उपकेंद्र चालू असल्याचे पाहून त्यांनी येथील कर्मचारी ज्योती तोडमल यांचे कौतुक केले. सुट्टीच्या दिवशी उपकेंद्र चालू ठेवणारे हे राज्यातील एकमेव गाव असल्याचेही ते म्हणाले. (वार्ताहर)
>तरुण पिढी ही याआधी टीव्हीवरील मालिकांमुळे बिघडत चालली होती. आता तर आधुनिक तंत्रज्ञान, व्हॉटस् अॅपमुळे तरुण वर्ग बिघडत चाललेला दिसत आहे.
- विजय शिवतारे, जलसंधारण व जलसंपदा राज्यमंत्री