Sanjay Raut News: सांगली जिल्ह्यातील उद्धवसेनेचे पदाधिकारी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यासह उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत प्रवेश केला. चंद्रहार पाटील यांच्यासोबत सातारा जिल्ह्यातील पहिला हिंद केसरी संतोष आबा वेताळ, पैलवान विकास पाटील यांनीही पक्षात प्रवेश केला. चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाला केलेला जय महाराष्ट्र जिव्हारी लागल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खंत बोलून दाखवली.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, चंद्रहार पाटील यांनी निवडणूक लढावी अशी इच्छा होती. त्या इच्छेसाठी आम्ही प्रतिष्ठा पणाला लावली. अशा माणसाने स्वार्थासाठी, लाभासाठी बेईमान व्हावे, हीच तर बेईमानी आहे. चंद्रहार पाटील यांच्यासाठी काय कमी केले. ठीक आहे सत्ता आली नाही. तुमच्या गावात तुम्हाला मते पडली नाहीत, अशी टीकाही संजय राऊतांनी केली.
आर्थिक लाभापोटीच चंद्रहार पाटील शिंदे गटात
तो कुणाच्या गळ्यातील चंद्रहार आहे, हा मुद्दा जाऊ द्या. अशी उपमा देऊ नका. त्याला विटासारख्या गावात १० हजार मते घेता आली नाहीत. अपक्ष लढणार होता. उमदा तरूण होता. त्याच्या क्षेत्रात त्याला काही तरी करायचे होते, म्हणून आम्ही उमेदवारी दिली. तो जर अपक्ष लढला असता तर ५ हजार मतेही मिळाली नसती. ६० हजार मते शिवसेनेची होती, म्हणून ती त्याला मिळाली. आर्थिक लाभापोटीच चंद्रहार पाटील शिंदे गटात गेल्याचा दावा संजय राऊतांनी केला.
दरम्यान, चंद्रहार पाटील यांचे पक्षात स्वागत करताना एकनाथ शिंदे म्हणाले होते की, नकली आखाड्यातून खऱ्या आखाड्यात आलात. पैलवान पाटील हे कुटील माणसाकडून स्वच्छ मनाच्या माणसाकडे आले आहेत. पाटील यांनी मराठी मातीचा खेळ असलेल्या कुस्तीला लौकिक मिळवून दिला. पैलवान हे महाराष्ट्राचे वैभव आहे. मी जरी पैलवान नसलो तरी २०२२ मध्ये समोरच्या लोकांना चारीमुंड्या चीत केले. तेव्हा असे डावपेच टाकले की ते अद्याप उठले नाहीत. पैलवानांना डावपेच माहीत असतात. कुस्तीला बळ देण्यासाठी त्याला राजकीय पाठिंबा आवश्यक आहे. चंद्रहार पाटील यांचा आखाडा मंत्री सामंत यांनी बघितला आहे. पाटील यांचा संकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी शिंदेसेनेची आहे, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.